दमदार पावसाने सर्वत्र पाणीच : बळ्ळारी नाल्याचा यावषीही पिकांना दणका; बळीराजा चिंतेत
प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवारी सकाळपासून झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शिवाराला पुराचा विळखा बसला आहे. याचबरोबर शिवारामध्ये पाणी साचून राहिल्याने भातपीक कुजून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून प्रशासनाच्या नावाने शिमगा करताना दिसत आहे. पाऊस कमी झाला नाही तर मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागणार असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱयांसमोर निर्माण झाले आहे. यापूर्वी अनेकवेळा बळ्ळारी नाला साफ करावा, यासाठी मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा फटका आता शेतकऱयांना बसला आहे.
बळ्ळारी नाला हा वडगाव, शहापूर, मजगाव, अनगोळ, धामणे, येळ्ळूर परिसराला शापच ठरत आहे. बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र मुर्दाड प्रशासनाला शेतकऱयांची कोणतीच दया आली नाही. यावर्षी मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पावसाने गेल्या चार दिवसांपासून झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱयांचे जीवन कष्टमय बनले आहे.
पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये अशाप्रकारे दमदार पाऊस झाल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. बळ्ळारी नाला जलपर्णी आणि झाडाझुडुपांनी तसेच माती व कचऱयाने बुजून गेला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होताना दिसत नाही. यातच हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी माती टाकण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱयांच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून असून नुकतेच पेरलेले भातपीक पाण्याखाली आहे. आता तातडीने जिल्हा प्रशासनाने याची पाहणी करून शेतकऱयांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान खासदार मंगला अंगडी यांनी बळ्ळारी नाला परिसराला भेट देऊन पाहणी केली व शेतकऱयांना नुकसानभरपाई देवू, असे आश्वासन दिले आहे.
बळीराजा नेहमीच संकटात
येळ्ळूर रस्ता, यरमाळ रोड, धामणे रोडवर असलेल्या शिवारांमध्ये पाणी शिरले आहे. पाणी पुढे जाण्यास वाटच नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पाऊस कमी झाला तरच दिलासा मिळणार आहे. अन्यथा या मान्सून पावसाचा फटका भातपिकाला बसणार आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र कोणतीच दखल घेतली नाही. बेळगाव परिसरातील बळीराजा हा नेहमीच संकटात आहे. एक तर निसर्गाचे संकट नाही तर दुसरे जिल्हा प्रशासनाचे संकट. कारण विविध प्रकल्पांसाठी जमिनी हिसकावून शेतकऱयांना नेस्तनाबूत करण्यात येत आहे. एकूणच बेळगाव परिसरात शेतकरीच उरणार नाही, अशी भीती या संकटांमुळे व्यक्त होत
आहे.