पावसाळय़ापूर्वी खोदाई झाली तरच बळीराजा वाचणार
प्रतिनिधी / बेळगाव
एकेकाळी बळ्ळारी नाल्याचे पाणी फिल्टर करुन पिण्यासाठी वापरले जात होते. मात्र आता बळ्ळारी नाला म्हणजे गटारगंगा झाली आहे. अनगोळ, वडगाव येथील ड्रेनेजचे पाणी थेट या नाल्याला सोडले जात आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येळ्ळूर अरवाळी धरणापासून उगम पावलेल्या या बळ्ळारी नाल्यामध्ये माती, झाडे, झुडपे आणि जलपर्णी वाढल्यामुळे यावषी पुन्हा शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, मजगाव, धामणे, बसवनकुडची, येळ्ळूर या परिसराला फटका निश्चित बसणार आहे. पावसाळय़ापूर्वी खोदाई झाली नाही तर शेतकऱयांनी शेतीच करणे थांबविणे सोयीचे ठरणार आहे.
तब्बल 27 कि.मी. असलेला हा बळ्ळारी नाला म्हणजे शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, मजगाव, अनगोळ, येळ्ळूर, धामणे, बसवन कुडची या परिसराला एक शाप ठरला आहे. जलपर्णींबरोबरच कचरा व मातीचा गाळ साचल्याने तो पूर्ण बुजून गेला आहे. पावसाळय़ापूर्वी या नाल्याची खोदाई होणे गरजेचे होते. पण अजून खोदाई झाली नाही. यामुळे यावषीही नाला परिसरातील हजारो एकर शेतजमिनीला फटका बसणार यात शंका नाही. येळ्ळूर रस्त्याला लागून शेतकऱयांनी जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता केली आहे. माती काढुन मोठी चर मारली आहे. मात्र बळ्ळारी नालाच तुडुंब मातीने आणि घाणीने साचल्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण जाणार आहे. तेंव्हा लघुपाठबंधारे खात्याने त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.