मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या स्वबळाच्या भाषेनंतर आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून त्यावर निशाणा साधला जात आहे. भाजपा नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये स्वबळाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत काँग्रेस आणि सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. . बळ-बळ करणाऱ्यांना जनता पळ काढल्याशिवास राहणार नाही अशी टीका दरेकरांनी केली आहे.
सत्ताधाऱ्यांना पक्षाच्या स्वबळाची पडली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची ताकद राहिली नाही. त्यांच्या बाहुत बळ राहिले नाही. राज्यातील कामगार देशोधडीला लागला असून त्याच्याही हातात बळ राहिले नाही. अशा वेळेला स्वबळाचे पडले आहे. परंतु सत्ताधारी अशाचप्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसले तर बळ-बळ म्हणताना जनता पळ काढल्याशिवाय राहणार नाही असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
यांना केवळ आपलं सरकार कसं टिकेल याची चिंता आहे. हे एकमेकांना शिव्या देखील देतात आणि एकमेकांसोबत नांदतायत पण. म्हणजे आज शिव्या द्यायच्या, संध्याकाळी भेटायचं, उद्या पुन्हा वेगळं बोलायचं. लाज-शरम काहीच वाटत नाही. तुम्ही स्वबळाचं, तुमच्या बळाचं काय करायचं ते करा. पण जर अशा पद्धतीने राज्याच्या जनतेचा छळ झाला आणि त्यांच्याच हातात बळ राहिलं नाही, तर ही जनता तुम्हाला पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत दरेकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.