अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोरील बसथांब्यात वाहनांचे पार्किंग : रहदारी पोलिसांसह परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरात प्रवाशांसाठी बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र सर्रास बसथांब्यांचा ताबा बेघर नागरिकांनी घेतला आहे. तर काही ठिकाणी बसथांबा म्हणजे पार्किंगतळ बनले आहे. अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर असलेल्या बसथांब्यात वाहने पार्क करण्यात आल्याने हा बसथांबा की पार्किंगतळ, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
बस प्रवाशांना बसची प्रतीक्षा करीत ऊन-पावसात थांबावे लागते. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर आणि उपनगरात स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी जुने बसथांबे अद्यापही जैसे थे ठेवण्यात आले आहेत. काही बसथांब्यांची दुरवस्था झाली तरी त्याचा वापर केला जातो. तर काही बसथांब्यांवर बेघर नागरिकांनी ठाण मांडले आहे. तसेच काही बसथांब्यांमध्ये दुचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे बसथांबे नेमके कुणासाठी, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्याचा विकास करण्यात आला असून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र देखभालीअभावी बसथांबा समस्यांचे आगार बनत आहे. वास्तविक, परिवहन मंडळाच्या नियमानुसार बसथांब्यापासून शंभर मीटर आवारात खासगी वाहने पार्क करण्यास बंदी आहे. मात्र हा नियम धाब्यावर बसून धर्मवीर संभाजी चौकातील बसथांब्याच्या आवारातच वाहने पार्क करण्यात येत आहेत. याकडे रहदारी पोलिसांसह परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे.
अग्निशमन कार्यालयासमोर दोन बसथांबे उभारण्यात आले आहेत. मात्र येथील एकाच बसथांब्याचा वापर केला जातो. दुसऱया बसथांब्यावर बस थांबत नसल्याने प्रवासी या ठिकाणी थांबत नाहीत. त्यामुळे या बसथांब्याचा वापर प्रवासी करीत नाहीत. मात्र या बसथांब्याचा वापर वाहने पार्क करण्यासाठी तसेच हातगाडय़ा ठेवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे लाखो रुपये निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या बसथांब्याचा दुरुपयोग होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. तसेच केएलई रुग्णालयासमोर असलेल्या बसथांब्यावर देखील दुचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे बसथांबा वाहने पार्क करण्यासाठी की प्रवाशांसाठी असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
प्रवाशांसाठी असलेल्या बसथांब्यांचा दुरुपयोग
राणी चन्नम्मा चौकाशेजारी नव्याने स्मार्ट बसथांब्याची उभारणी करण्यात आली आहे. तसेच शेजारीच जुना बसथांबा आहे. सदर बसथांबा पूर्णपणे जीर्ण झाला असून छत कोसळण्याच्या स्थितीत आहे. येथील बस प्रवाशांची संख्या पाहता जीर्ण झालेल्या बसथांब्याचा देखील विकास करणे गरजेचे आहे. पण याकडे महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. प्रवाशांसाठी असलेल्या बसथांब्यांचा दुरुपयोग होत असल्याने याची पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.