बसथांब्याअभावी प्रवाशांचे हाल, बसथांबा उभारण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराची स्मार्ट सिटीच्या माध्यमातून वाटचाल सुरू आहे. शहरात नवीन स्मार्ट बसथांबे उभारून विकास साधण्यात येत आहे. दुसरीकडे युनियन जिमखान्याजवळील पश्चिम भागात जाणाऱया प्रवाशांसाठी बसथांब्याअभावी ताटकळत थांबावे लागत आहे. कित्येक दिवसांपासून बसथांबा उभारावा अशी मागणी करून देखील याकडे साप दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पश्चिम भागातील बेळगुंदी, बाकनूर, बिजगर्णी, बडस, राकोसकोप, यळेबैल, सोनोली, बेनकनहळ्ळी, कावळेवाडी, तुडये आदी भागातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे परिसरात प्रवाशांनी एकच गर्दी असते. मात्र बसण्यासाठी बसथांब्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे.
दररोज हजारो प्रवाशांची खरेदी व इतर कामासाठी शहराकडे ये-जा असते. मात्र वेळेत बससेवा नसल्याने प्रवाशांना बसथांब्याजवळ थांबावे लागते. मात्र बसथांबा नसल्याने प्रवासी भर उन्हात रस्त्यावर ताटकळत थांबलेले पहायला मिळत आहे. यामध्ये लहान मुले, महिला व वयोवृध्दांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जवळ-जवळ दहा ते पंधरा गावचे प्रवासी याठिकाणी थांबत असल्याने विशेष करून सकाळ व संध्याकाळच्या वेळेत गर्दी होत आहे. परिणामी प्रवासी बसच्या प्रतीक्षेत भर रस्त्यात थांबत आहेत. त्य़ामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघात घडण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांना परवानगी दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी देखील आता येत आहेत. मात्र बसथांब्याजवळ कोणतीच सोय नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. दुपारच्या वेळेत प्रवासी उन्हाच्या झळापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली आसरा घेताना दिसत आहेत. प्रवाशांना अनेक अडचणीचा सामोरे जावे लागत असून याठिकाणी तातडीने बसथांबा उभारावा, अशी मागणी होत आहे.