निवडणुकीपूर्वी मायावती यांना मोठा झटका – भाजपचा एक आमदारही सपमध्ये सामील
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना मोठा झटका बसला आहे. बसपच्या 6 आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याचबरोबर सीतापूरचे भाजप आमदार राकेश राठौड यांनीही अखिलेश यादव यांच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. सप अध्यक्ष अखिलेश यांनीच लखनौमधील पक्ष कार्यालयात सर्व 7 आमदारांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.
सपमध्ये सामील बसप अन् भाजपच्या आमदारांचे अखिलेश यांनी स्वागत केले आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर शरसंधान केले आहे. “सरकारमध्ये बसलेल्या माननीयांनी दिवाळीचा सण जवळ आल्याने स्वतःच्या घराची सफाई चांगल्याप्रकारे करवून घ्यावी. ज्यामुळे धूराच्या खुणा मिटून जातील आणि उर्वरित सर्वकाही हटवून घ्या, जेणेकरून आगामी सरकारला तेथे काहीच मिण्t नये’’ अशी उपरोधिक टीका अखिलेश यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना नारा बदलावा लागेल
भाजपचे राकेश राठौड पक्षात सामील झाल्यावर अखिलेश यादव यांनी योगींना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांना स्वतःचा नारा बदलावा लागू शकतो. ‘मेरा परिवार, भाजप परिवार’च्या जागी ‘मेरा परिवार, भागता परिवार’ असा नारा त्यांनी द्यावा. अनेक लोक आमच्या पक्षात येऊ इच्छित आहेत. आगामी निवडणुकीत भाजपचे उच्चाटन होईल इतप जन आक्रोश असल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे.
बसपला खिंडार
दीर्घकाळापासून बसपचे आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. समाजवादी पक्षात प्रवेश घेणाऱया बसप आमदारांमध्ये अस्लम राईनी (श्रावस्ती, भिनगा), अस्लम अली चौधरी (हापुड, ढोलना), मुज्तबा सिद्दीकी (प्रयागराज, प्रतापपूर), हाकिम लाल बिंद (प्रयागराज, हांडिया), हर गोविंद भार्गव (सीतापूर, सिधौली) आणि सुषमा पटेल (जौनपूर, मुंगरा बादशाहपूर) सामील आहेत.
आगामी काळ ‘सप’चा
आम्ही 6 आमदारांनी आगामी काळ समाजवादी पक्षाचा असल्याचे पूर्वीच हेरले होते. आम्हा 6 आमदारांमुळेच राज्यात समाजवादी पक्षाची त्सुनामी येणार आहे. अखिलेश यादव यांनी आम्हाला प्रचंड सन्मान दिल्याचा दावा श्रावस्तीचे आमदार अस्लम राईनी यांनी म्हटले आहे. आम्हाला कुठलेही कारण न देता बसपमधून निलंबित करण्यात आले होते. अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रिपद मिळवून देण्यासाठी आम्ही संकल्प घेतला असल्याचे विधान सुषमा पटेल यांनी केले आहे. तर हापूडचे आमदार अस्लम अली यांनी राज्याला अखिलेश यादव यांची गरज असल्याचे म्हटले आहे.