जुना बसपासची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत, प्रवासासाठी नवीन आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की परिवहनकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास वितरित केला जात होता. मात्र गतवषीपासून शैक्षणिक वर्षाला सुरळीत प्रारंभ झाला नाही. त्यामुळे बसपास वितरण प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. गत आठवडय़ापासून शाळांना प्रारंभ झाल्याने बसपास प्रक्रियेलाही प्रारंभ झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी बसपास मिळविण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 1 सप्टेंबरपासून बसपास प्रक्रिया सुरू झाली असली तरी केवळ हातावर मोजण्याइतकेच अर्ज बसपास विभागात दाखल झाले आहेत. त्यामुळे बसपासकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
सहावी ते बारावीपर्यंतचे ऑफलाईन वर्ग सुरू करायला शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासासाठी बसपास आवश्यक आहे. मात्र गतवषीपासून बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. ही प्रक्रिया थोडी किचकट व वेळखाऊ असल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय बसपास उपलब्ध व्हायलाही बराच कालावधी लागत असल्याने विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
मागील शैक्षणिक वर्षाच्या बसपासची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने 15 सप्टेंबरपर्यंत बसपासची मुदत वाढवून दिली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत नवीन बसपास मिळविणे आवश्यक आहे. मात्र अद्याप बऱयाच विद्यार्थ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. जुन्या बसपासची मुदत संपायला केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे परिवहन जुना पासची मुदत वाढवून देणार की विद्यार्थ्यांना पुढील प्रवास तिकीट काढून करावा लागणार? हे 15 सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
विद्यार्थ्यांना बसपास मिळवायचा असल्यास पहिल्यांदा सेवासिंधू पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केलेली एक प्रत शाळा-महाविद्यालयात द्यावी लागणार आहे. त्यानंतर शाळेमार्फत अर्ज बसपास विभागात द्यावा लागणार आहे. त्यानंतर अर्जाची छाननी करूनच बसपास उपलब्ध केले जाणार आहेत. शिवाय अर्ज करताना शैक्षणिक शुल्क भरलेली पावती, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.