अर्ज दाखल करण्यासाठी आगारात गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
शाळा-महाविद्यालये आणि परिवहनमध्ये समन्वय नसल्यामुळे बसपास प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना वेळेत बसपास मिळत नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील चार दिवसांपासून बसपास विभागात बसपास प्रक्रियेच्या कामाला गती आली आहे. बसपास मिळविण्यासाठी अर्ज दाखल करणाऱयांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच बसपास उपलब्ध होणार आहेत.
जुन्या बसपासची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने दोन वेळा जुन्या बसपासची मुदत वाढविली होती. वाढीव मुदत 26 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सध्या तिकीटावर सुरु आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. परिवहनने गेल्या महिन्यापासून बसपास प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. मात्र बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थीच निरूत्साही असल्याचे दिसत आहे. परिवहनने वाढीव मुदत बंद केल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविणे अनिवार्य आहे. त्यामुळे बसपास मिळविण्यासाठी सेवासिंधू पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केलेली पावती शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून बसपास आगारात नेवून देणे आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालयातून आलेल्या अर्जांची छाननी करून बसपास वितरित केले जात आहेत.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 150 रु., माध्यमिक शाळेतील सामान्य विद्यार्थ्यांना 750रु. तर विद्यार्थिनींना 550 रु., सामान्य वर्गातील पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा विद्यार्थ्यांना 1050 रु. तर अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना 150 रु. आयटीआय सामान्य विद्यार्थी 1310 रु. व्यावसायिक अभ्यासक्रमातील सामान्य विद्यार्थी 1550 रुपये याप्रमाणे बसपासचा दर आहे.