वेळकाढू प्रक्रिया : वेळेत बसपास मिळत नसल्याने तिकीट काढून विद्यार्थ्यांचा प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा शैक्षणिक वर्षाला उशिराने सुरुवात झाल्याने बसपास प्रक्रियेलादेखील उशिरा सुरुवात झाली आहे. गतवर्षापासून बदललेल्या बसपास प्रक्रियेद्वारे बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थी ही निरुत्साही दिसत आहेत. दरवषी परिवहनकडून सुरळीत बसपास वितरित केला जात होता. मात्र मागील वर्षापासून ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे. विद्यार्थ्यांना वेळेत बसपास मिळत नसल्याने तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे.
दसऱयाची सुटी संपल्यानंतर पहिलीपासूनच्या सर्व वर्गांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बसने प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र परिवहनकडून विद्यार्थ्यांना वेळेत बसपास मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळा-महाविद्यालये आणि परिवहन मंडळ यांच्यात समन्वय नसल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविताना अडचणी निर्माण होत आहेत. माध्यमिक शाळा, कॉलेज महाविद्यालयानंतर आता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील बसपासचे वितरण केले जात आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीमुळे बसपास मिळविताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बसपासही वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
बसपास काढायचा असल्यास प्रथमतः सेवासिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केलेली पावती शाळा-महाविद्यालयात जमा करावी लागते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेतील संबंधित कर्मचाऱयांकडून बसपास विभागात जमा करणे आवश्यक आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून बसपास उपलब्ध करून दिले जात आहेत. ही प्रक्रिया वेळकाढू असल्याने विद्यार्थ्यांना देखील बसपास मिळण्यास विलंब होत आहे.