30 जूनला संपणार जुन्या बसपासची मुदत : नवीन बसपासला अल्पप्रतिसाद : केवळ 910 अर्ज दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास प्रक्रियेलादेखील प्रारंभ होतो. 16 मे पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. त्या पाठोपाठ विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बसपास प्रक्रियेलादेखील सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थी बसपास काढण्यासाठी निरुत्साही असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बसपास प्रक्रियेला अल्पप्रतिसाद मिळत आहे.
मागील पंधरा दिवसांत केवळ 910 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत 224 विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी नवीन बसपास मिळविणे आवश्यक आहे. मात्र, नवीन बसपास प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद दिसून येत आहे. दरवषी बेळगाव विभागातील चार आगारांसह खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती या सात आगारांतून 76 हजारांहून अधिक विद्यार्थी बसपास मिळवितात. मात्र, मागील दोन वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाबरोबर बसपास प्रक्रियादेखील विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बसपास काढणाऱया विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती. यंदा शाळांना सुरळीत सुरुवात झाल्याने बसपास घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा परिवहनला आहे.
बसपासच्या आधारे शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीखातर जुन्या बसपासची मुदत वाढविली असली तरी विद्यार्थ्यांनी नवीन बसपास वेळेत काढणे आवश्यक आहे. परिणामी 30 जूननंतर विद्यार्थ्यांना बसपास नसल्यास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे वेळेत बसपास मिळविणे गरजेचे आहे.