बहराइचमध्ये मायावतींचे वक्तव्य : शेतकऱयांवरील गुन्हे मागे घेणार
बसप सर्वेसर्वा मायावतींनी दलित, आदिवासी तसेच मागास वर्गाच्या समस्यांसाठी काँग्रेसला जबाबदार ठरवत सप तसेच भाजपलाही लक्ष्य केले. हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. बसप सत्तेवर आल्यास आंदोलनादरम्यान शेतकऱयांवर नोंद झालेले गुन्हे चौकशी करत मागे घेतले जातील आणि गुंड-माफियांना तुरुंगात डांबण्यात येईल असे मायावती म्हणाल्या. दलित तसेच मागासवर्गीयांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी शासकीय जमिनीवर शेतीसाठी भूखंड तसेच दोन खोल्यांचे घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्र तसेच देशातील बहुतांश राज्यांमध्ये राहिलेली काँग्रेसची सरकारे प्रचंड जातीयवादी, दलित तसेच आदिवासी आणि अन्य मागास वर्गाच्या विरोधी आहेत. काँगेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिले नाही. तर आंबेडकरांचे कार्य पुढे नेणारे काशीराम यांच्या निधनानंतर राष्ट्रीय शोक जाहीर करण्यास नकार दिला होता. काँग्रेस सरकारने मंडल आयोग लागू करणे टाळले होते. स्वतःच्या याच चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस आता देश तसेच अनेक राज्यांच्या सत्तेवरून हद्दपार झाल्याची टीका मायावतींनी केली आहे.
समाजवादी पक्षाचे सरकार असताना दंगलखोर आणि गुंडांचाच दबदबा राहिला. सप एक विशेष क्षेत्र आणि विशेष समुदायासाठी काम करतो. सप सकारमध्ये दंगलींमुळे तणावाची स्थिती राहते. समाजवादी पक्षाने आमच्या महापुरुषांच्या नावावर निर्माण शैक्षणिक संस्था आणि जिल्हय़ांची नावे बदलली. भाजपने देखील न्याय केला नाही. भाजप जातीयवादी आणि संघाच्या इशाऱयावर चालणारा पक्ष आहे. भाजपने दलित, आदिवासी, मागास आणि मुस्लिमांसाठी सुरू असलेल्या योजना बंद केल्या. आरक्षणाचा लाभ भाजप सरकारमध्ये मिळत नाही. भाजप सरकारमुळे मुस्लीम भीतीच्या वातावरणात जगत असल्याचा दावा मायावतींनी केला आहे.
भाजप सरकारच्या काळात ब्राह्मणाचे मोठे नुकसान झाले आहे. बसप सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढत आहे. 2007 मध्ये आमचे सरकार आले असता रोजगारासाठी परराज्यात गेलेले लोक परतले होते. बसपने राज्यात 4 वेळा सरकार स्थापन केले आणि लोकांना रोजगार दिला. आता रोजगार नसल्याने स्थलांतर होत आहे. आमचे सरकार आल्यावर सर्वांना परत बोलावून रोजगाराची व्यवस्था करू असे त्या म्हणाल्या.