महापालिकेच्या व्याप्तीमध्ये घेऊन 40 वर्षांहून अधिक कालावधी लोटला : मात्र परिसराचा विकास खुंटलेलाच
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचा विस्तार वाढत चालला आहे. शहराच्या पूर्वेस महापालिकेची हद्द बसवण कुडची-शिंदोळी क्रॉसपर्यंत आहे. हा परिसर महापालिकेच्या व्याप्तीमध्ये घेऊन 40 वर्षांहून अधिक कालावधी लोटला. मात्र अद्यापही परिसराचा विकास खुंटलेलाच आहे. कर आकारणी महापालिकेची आणि विकास मात्र ग्राम पंचायतप्रमाणे, अशी अवस्था झाली आहे. यामुळे बसवण कुडची परिसरातील समस्यांचे निवारण केव्हा होणार? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. या निषेधार्थ आंदोलन छेडण्याच्या तयारीत येथील नागरिक आहेत.
अनधिकृत कॉलनीमध्ये राहणारे लोक हे महापालिकेला कर भरतात. त्यामुळे त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणे कर्तव्य आहे. पण बसवण कुडची परिसर अधिकृत वसाहत असूनदेखील देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचप्रमाणे महापालिकेला करदेखील भरतात. मग त्यांना नागरी सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे कर्तव्य नाही का? असा मुद्दा नागरिक उपस्थित करीत आहेत. स्वयंघोषित कर आकारणी पद्धतीने मालमत्ता करभरणा करतात. तरीदेखील येथील समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पाणी पुरवठय़ाव्यतिरिक्त महापालिकेने कोणता विकास केला आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बसवण कुडची परिसरात नागरी सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था, गटारी कचऱयाने माखलेल्या आणि नाल्याची अस्वच्छता अशा विविध समस्या येथील रहिवाशांना भेडसावत आहेत. नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
गटारीमधील कचरा काढला जात नसल्याने बसवण कुडची येथील गटारी कचऱयाने माखल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. काही ठिकाणी गटारी खराब झाल्याने सांडपाण्याचा निचरा होणे मुश्कील बनले आहे. महापालिकेच्यावतीने औषध फवारणी केली जात नाही. यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
काही मोजक्याच रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे. काही रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. गृहनिर्माण खात्याने निर्माण केलेली वसाहत तसेच देवराज अर्स वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक अडचणींना तेंड द्यावे लागते. डेनेजची सुविधा नसल्याने सेप्टीक टँक बांधून सांडपाणी रस्त्यावर तसेच गटारीमध्ये सोडण्यात आले आहे. येथील सांडपाणी केलकेरी तलावामध्ये सोडण्यात आले आहे. ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साचली आहेत. पथदिपाच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. काही ठिकाणी टय़ुबलाईट बसविण्यात आल्या असल्याने बहुतांश ठिकाणी अंधार पसरलेला असतो. 40 वर्षांपासून येथील रहिवाशांना नागरी सुविधांकरिता झगडावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
गावामध्ये पाण्याची पातळी बऱयापैकी आहेत. त्याचप्रमाणे गावच्या दक्षिणेस दोन मोठे तलाव आणि तीन विहिरी असल्याने पाण्याची समस्या भेडसावत नाही. नळांना आठवडय़ात एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाबाहेर असलेल्या विहिरींकडे धाव घ्यावी लागते.
सांडपाण्याचा निचरा होणे कठीण
देवराज अर्स कॉलनी आणि बसवण कुडची परिसराला चार स्वच्छता कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार कर्मचारी आठवडय़ामधून एकदा किंवा दोनदा येऊन स्वच्छतेचे काम करतात. बसवण कुडची येथील रहिवाशांच्या परसात कचरा टाकण्यासाठी खड्डे असल्याने विशेषतः रस्त्यावर कचरा निर्माण होत नाही. मात्र देवराज अर्स कॉलनीमधील कचऱयाची उचल केली जात नसल्याने कचरा साचतो. देवराज अर्स कॉलनीमधील गटारींवर गवत उगवल्याने गटारीच गायब झाल्या आहेत. काही ठिकाणी गटारी खराब झाल्याने सांडपाण्याचा निचरा होणे मुश्कील बनले आहे. महापालिकेच्यावतीने औषध फवारणी केली जात नाही. यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
देवराज अर्स कॉलनीला जाणाऱया रस्त्यावर गायरान जागेत मराठी शाळा, महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. तसेच विविध समाजाच्या स्मशानभूमी आहेत. स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. याठिकाणी हायमास्ट बसविण्यात आला आहे. मात्र कधीच सुरू नसतो. बसवण कुडची आणि देवराज अर्स कॉलनीमधील उद्यानांचा विकास करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. यामुळे देवराज अर्स कॉलनीमधील उद्यानामध्ये जनावरे चारण्यास सोडण्यात येतात. तसेच येथील खेळाचे साहित्य खराब झाले आहे. शहरातील आणि अनधिकृत कॉलनींमधील उद्यानांचा विकास करण्यावर बुडा प्रशासनाने भर दिला आहे. पण देवराज अर्स कॉलनी बुडाने निर्माण करूनही विकास करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
अन्यथा रास्तारोको करण्याचा इशारा
सध्या हा वॉर्ड क्रमांक 48 मध्ये येत असून विकासकामे राबविण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. आठवडय़ात येथील विकासकामे हाती घेऊन समस्यांचे निवारण करावे, अन्यथा रास्तारोको करण्याचा निर्णय नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रविवारी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक बसवराज मोदगेकर, शेखर कम्मार, महेश हिरेमठ, डॉ. जगत शंकरगौडा, अब्दुलबारी यरगट्टी, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.