तात्पुरत्या बसस्थानकात आसनांची संख्या कमी : प्रवाशांना भर उन्हातच थांबावे लागतेय ताटकळत
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकात आसनांअभावी प्रवाशांची गैरसोय होत असून प्रवाशांना भर उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बसस्थानकात आसनांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.
कोरोनामुळे थंडावलेली बससेवा पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. शिवाय प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांना परवानगी दिल्याने पासधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र बसस्थानकात काही ठिकाणी निवाऱयाची सोय नसल्याने प्रवाशांना भर उन्हातच थांबावे लागत आहे.
दररोज हजारो प्रवाशांनी गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना गैरसोयींचा अधिक सामना करावा लागत आहे. परिवहन मंडळाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बसस्थानकात ठेवण्यात आलेली आसने अपुरी पडत असल्याने प्रवाशांना बसथांबा सोडून बाहेर थांबावे लागत आहे. त्यामुळे आवारात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाल्याने रस्ते धुळीने माखले आहेत. त्यामुळे बाहेर थांबणाऱया प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची संख्या वाढत असली तरी प्रवाशांना बसण्यासाठी आसने कमी पडत असल्याने ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी तातडीने आसनांची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.