एसटी बस स्टॅडवर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ,
प्रतिनिधी/ सातारा
सातारा बसस्थानकात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून बेघर फिरस्ती वृद्ध महिला जागीच ठार झाली. गौडाबाई काळे (वय 75) असे तिचे नाव आहे. ही बसस्थानकातील पहिली घटना नाही. काही दिवसापुर्वीच एक वाहक बस नोंद करून परत जात असताना दोन एसटीबसच्या मध्ये सापडला. यात तो जखमी झाला. तर दोन वर्षापुर्वी सांगलीहून आपल्या भावाला भेटायला आलेली वृद्ध महिला देखील बसच्या पुढून जाताना चाकाखाली सापडून तिचा दुदैवी मृत्यू झाला. या जीवघेण्या घटना घडत असूनही संबंधित प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. वेळेच्या व्यवस्थापनासोबत प्रवाशांना मार्गदर्शन करणे ही गरजेचे असताना आणखी किती बळी जाण्याची वाट परिवहन महामंडळ सातारा आगारातून बघितली जाणार आहे.
बसस्थानकावर एक फिरस्ते कुटुंब वास्तवात आहे. या कुटुंबातील एक वृद्ध महिला गौडाबाई काळे ही शुक्रवारी सकाळी 7 वाजता उठून स्टॅडमधून बाहेर निघाली होती. यावेळी शिवशाही बस आली. एकावेळी दोन शिवशाही बस आल्याने तिला काही कळण्याआधीच ती मुंबईला जाणाऱया फलाटावरील शिवशाही बस (क्रं. एमएच 06 बीडब्लु 0642) च्या पुढच्या चाकाखाली सापडली. यामुळे ती जागीच ठार झाली. यांची माहिती चालकाला मिळताच त्याने बस जागीच थांबवली. गौडाबाईंना बघून कुटुंबातील इतर सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत हंबरडा फोडला. या अपघाताची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संबंधित महिलेचा मृत्यू कोणाच्या चुकीमुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. या घटनेची नेंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
एसटीबस स्टॅडवरून रोजच जीवघेणा प्रवास
एसटीचा संप मागे घेण्यात आल्याने सर्वत्र एसटीच्या फेऱया पूर्ण क्षमतेने सूरू झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा वाढता ओढा आता एसटीबसकडे आहे. यामुळे वेळेत एसटीबस पकडण्याच्या नादात अनेकजण चुकीच्या गोष्टी करतात. धावत्या बस मागे पळणे, एसटीबसच्या पुढून जाणे, तसेच चुकीच्या पद्धतीने स्टॅडवरून चालत जाणे असे प्रकार केल्याने स्वतःहून मृत्यूला आमंत्रण दिले जात आहे.
सातारा आगारात प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे
सातारा आगारात एसटीबस खाली सापडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या एसटी स्टॅडवर प्रवाशांना कधीही सूचना करण्यात येत नाहीत. तसेच एसटी बस आता बाहेर करण्याचे नियोजन नाही. कोणत्याही ठोस उपाययोजना न करता फक्त एसटीबस फायद्यात राहण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे चित्र सातारा आगारात पहायला मिळत आहे.