दरवाजाची कडी कटावणीच्या साहाय्याने तोडली : सीसी कॅमेऱयाचीही केली मोडतोड
वार्ताहर /किणये
बस्तवाड (हलगा) येथील प्राथमिक मराठी शाळेत काही समाजकंटकांनी धुडगूस घातला आहे. दरवाजाची कडी तोडून कपाटे फोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी शिक्षकांच्या निदर्शनास आला असून रविवारी रात्री समाजकंटकांनी हे कृत्य केले असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
बस्तवाड (हलगा) गावातील प्राथमिक मराठी शाळेची तोडफोड करण्यात आली असल्यामुळे शिक्षणप्रेमी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळी शाळेत शिक्षक आल्यानंतर सदर तोडफोडीचा प्रकार निदर्शनास आला. मुख्याध्यापक सतीश कदम यांनी एसडीएमसीचे अध्यक्ष प्रकाश बांडगी यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर शाळेत एसडीएमसी कमिटीचे सदस्य व गावातील काही प्रमुख पंचमंडळी दाखल झाले.
समाजकंटकांनी शाळेच्या दरवाजाची कडी कटावणीच्या साहाय्याने तोडून शाळेत प्रवेश केला. त्यानंतर दोन कपाटे फोडण्याचा प्रयत्न केला. कपाटाच्या वरील बाजूने कटावणी घालून कपाटे फोडण्यासाठी प्रयत्न झाला. पण यात ते अयशस्वी ठरले आहेत. आजुबाजूला आवाज जात असणार या भीतीने त्यांनी तेथून पलायन केले असावे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
शाळेच्या पटांगणाजवळील इमारतीच्या भिंतीवर सीसीटीव्ही लावण्यात आला होता तो कॅमेराही त्या समाजकंटकांनी फोडला आहे. या प्रकाराची माहिती बागेवाडी पोलीस स्थानकात देण्यात आली असल्याची माहिती एसडीएमसी अध्यक्ष बांडगी यांनी दिली.
मंगळवारी सकाळी बागेवाडी पोलिसांनी शाळेत येऊन पाहणी केली. तसेच पीडीओ श्वेता, सीआरपी आय. एम. ब्याली यांनीही शाळेला भेट देऊन पाहणी केली असल्याचे मुख्याध्यापक कदम यांनी सांगितले.
शाळा हे विद्येचे पवित्र मंदिर मानले जाते पण बस्तवाड भागातील काही तरुणांना शाळा आणि विद्येची देवता हिचा विसर झाला असल्याचे दिसून येत आहे. कारण शाळेच्या आवारात काही जण दारू पित आहेत. तर काही जण सिगारेट ओढून त्या ठिकाणी सिगारेटची पाकिटे टाकत आहेत, अशी माहिती एसडीएमसी कमिटीच्या सदस्यांनी दिली आहे.
बस्तवाड (ह.) गावातील प्राथमिक मराठी शाळेची स्थापना होऊन 100 वर्षे पूर्ण झाली आहे. शतकपूर्तीनंतरच्या शाळेबद्दल वडिलधारी मंडळींना अभिमान वाटतो आहे. गावात शाळा उभारण्यासाठी आम्ही बरेच हाल सोसले आहेत., अशी माहिती वडीलधारी देत आहेत.
आपल्या वडीलधाऱयांनी गावात मराठी शाळा, मराठी संस्कृती टिकावी यासाठी केलेले प्रयत्न, त्यांची पराकाष्टा याची जाणीव सध्याच्या तरुण पिढीला होणे गरजेचे आहे. समाजकंटक जर विद्येच्या मंदिराचीच तोडफोड करत असतील तर आता माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण ते समाजकंटक माजी विद्यार्थीच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.