धामणे ग्राम पंचायत सदस्यांची खासदार मंगला अंगडी यांच्याकडे मागणी
वार्ताहर /धामणे
धामणे ते बस्तवाड (हा.) हा तीन किलोमीटरचा रस्ता तीन महिन्यापासून जेसीबीच्या साहाय्याने उखडून ठेवण्यात आला आहे. हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी धामणे ग्राम पंचायत सदस्यांनी केली आहे.
कुरबरहट्टीपासून बस्तवाडपर्यंतचा रस्ता करण्यासाठी प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत बेळगाव लोकसभेचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनी मागील वर्षी या रस्त्यासाठी दोन कोटी 91 लाख 78 हजार रुपये मंजूर करून घेतले होते. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर होताच लोकांची मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱयांनी या रस्त्याच्या कामाचे पूजन करून हा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उखडण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आल्याने या रस्त्यावरुन दुचाकी वाहन जाणेही कठीण झाले आहे. बस्तवाडपासून कुरबरहट्टी, येळ्ळूर, देसूर येथून खानापूर रस्त्याला जोडला गेल्याने या रस्त्याने रहदारी जास्त असते.सदर रस्ता उखडून ठेवल्याने या रस्त्याने वाहतूक बंद झाली आहे.
बस्तवाड किंवा या भागातील कोणत्याही गावाला जाण्यासाठी वडगाव जुनेबेळगाव येथून जावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. गैरसोय दूर करण्यासाठी खासदार मंगला अंगडी यांनी कुरबरहट्टी ते बस्तवाड या रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी ग्रा. पं. सदस्य एम. आर. पाटील, ग्रा. पं. सदस्य मारुती मरगाणाचे, रामा सैबन्नावर, विठ्ठल सैबन्नावर, मल्लाप्पा पाटील, महावीर चौगेंड आणि इतरांनी केली आहे.