अनेक घरांत पाणी, मुसळधार पावसामुळे फुटले तलाव
प्रतिनिधी/ बेळगाव
बस्तवाड-हलगा (ता. बेळगाव) येथे सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गावच्या बाहेर असलेले तलाव फुटून जवळच असलेल्या वसती गृहांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचा संसावर उघडय़ावर आल्याचे दिसून येत आहे. या तलावात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याचा जोर वाढल्याने हे तलाव फुटले असावे, असे सांगण्यात येत आहे.
धामणे रोडवर लागून असलेल्या हरिजन वाडय़ाच्या वरील बाजुला हे तलाव होते. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे या तलावात पाणी तुडुंब भरले होते. नुकतीच या तलावाचे काम उद्योग खात्रीतून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तलाव तुडुंब भरल्याने आणि तलावातील पाणी विसर्ग करण्यासाठी जागा नसल्याने हे तलाव फुटले असावे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
या तलाव परिसरात असणाऱया बाबुराव जातिबा बांडगी यांच्यासह इतरांच्या घरात पाणी शिरले. हे पाणी बाहेर काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. याबाबत संबंधितांनी ग्राम पंचायतीकडे तक्रार केली असता त्यांनी या जागी तुम्हाला कोण घरे बांधण्यासा सांगितली होती का? असा सवाल करत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तलावातील पाणी शिवारात शिरुन शिवाराचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
वसती योजनेंतर्गत काही कुटुंबीयांनी धामणे रोडवरील मराठा स्मशानभूमी परिसरात घरे बांधली होती. याच परिसरात हे तलाव होते. मात्र पावसाने तुडुंब भरुन ते फुटल्याने या घरांचे नुकसान झाले आहे. मागील 10 ते 15 वर्षांपासून ही कुटुंबीय येथे राहतात. यासाठी ग्राम पंचायतीने योग्य नियोजन करण्याची गरज होती. मात्र उलट संबंधितांना उलट उत्तरे देण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या तलावामध्ये गावातील जनावरे धुण्यात येत होती. आता हे तलाव फुटल्याने समस्या निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. संबंधित कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी व तलावाची पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.