बसस्थानक सुनेसुने, परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम : दररोज 60 लाखाचे नुकसान
प्रतिनिधी / बेळगाव
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात क्लोजडाऊन जारी करण्यात आला आहे. 14 दिवस सर्वप्रकारची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट पसरला आहे. नेहमी गजबजणारे बसस्थानक सुनेसुने झाले आहे.
परिवहन मंडळाची धावणारी बससेवा क्लोजडाऊनमुळे ठप्प झाल्याने परिवहनच्या दैनंदिन उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. बेळगाव विभागाला सर्वप्रकारच्या बस माध्यमातून दररोज 60 लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र बससेवा ठप्प झाल्याने परिवहनच्या दैनंदिन उत्पन्नावर पाणी फिरले आहे. स्थानिक, लांबपल्ल्याच्या व वातानुकूलित बसच्या माध्यमातून परिवनहला उत्पन्न मिळत असते. मात्र मागील काही दिवसांपासून कर्मचाऱयांचा संप व आता क्लोजडाऊनमुळे परिवहन अडचणीत आले आहे.
गतवषी देखील कोरोनामुळे जवळजवळ चार-पाच महिन्यांहून अधिक काळासाठी बससेवा ठप्प झाली होती. दरम्यान बेळगाव विभागाला 110 कोटींचा फटका बसला होता. त्यामुळे तोटय़ात काम करत असलेल्या परिवहनला कर्मचाऱयांसाठी वेतनासाठी राज्य सरकारची मदत घ्यावी लागली होती. अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र गेल्या एक-दोन महिन्यापासून परिवहनची बससेवा पूर्ववत सुरू झाली होती. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत होती. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातल्याने शासनाने क्लोजडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बससेवाही जाग्यावर थांबून आहे.
बेळगाव विभागातून महाराष्ट्रात व गोवा राज्यात धावणारी बससेवाही थांबविण्यात आली आहे. महाराष्ट्रत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प आहे. शिवाय बेळगाव-गोवा देखील बससेवा ठप्प आहे. बेळगाव विभागाला विविध मार्गावर धावणाऱया बसच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र क्लोजडाऊन तब्बल 14 दिवस बससेवा बंद राहणार असल्याने परिवहनला मोठा फटका बसणार आहे. बेळगाव आगारात रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर आगाराचा समावेश आहे. या सर्वच आगारातून धावणाऱया बसेस क्लोजडाऊनमुळे मंगळवारी रात्रीपासून जाग्यावर थांबून राहणार आहेत. मागील वर्षभरापासून आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनसमोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून शेजारील महाराष्ट्र व गोवा राज्यांत धावणाऱया बसेसची संख्या अधिक आहे. याबरोबरच आगारातून तिरूपती, म्हैसूर, गोवा, विजापूर, बेंगळूर आदी पर्यटन स्थळांकडे धावणाऱया बसेसही अधिक प्रमाणात आहेत. मात्र आता या सर्वच जाग्यावर थांबून आहेत.