ग्रामीण भागातील कामगारांचीही पाठ : मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार , कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती
प्रतिनिधी / खानापूर
परिवहन खात्याच्या कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या दोन दिवसात तालुक्यातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा परिणाम खानापूरच्या नित्य व्यवहारावरही दिसून आला. गेले दोन दिवस शहरातील स्टेशनरोड बाजारपेठ परिसरात म्हणावी तसी गर्दी नव्हती. परिवहन कर्मचाऱयांच्या संपाची झळ तालुक्यातील बाजारपेठेलाही बसली. बस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक खानापूरकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे बुधवारी व गुरुवारी खानापूर बाजारपेठेतील व्यवसाय मात्र थंडच राहिला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेकांना पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती आहे. त्यातच गुढीपाढवाही तोंडावर आला असून नव्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होणार होती. पण परिवहन बसेस गेल्या दोन दिवसापासून बंद राहिल्याने त्याचा परिणाम खानापूर बाजारपेठेवर जाणवला. ग्रामीण भागातूनही ग्राहक खानापूरकडे फिरकले नसल्याने खानापूर बाजारपेठेत विस्कळीतपणा आला आहे.
खानापूर-बेळगावला काम करणारे बहुतांश कामगारही ग्रामीण भागातून येतात. पण बसेस नसल्याने अनेकांनी कामाला दांडी मारली. त्यामुळे दुकानामध्ये सुद्धा कामागारांची कमतरता जाणवली. तसेच खानापूर परिसरात राहणारेच लोक बाजारपेठेत खरेदीसाठी दिसून आले. त्यामुळे मागील अनेक महिन्यानंतर बाजारपेठेला पुन्हा एकदा झळ बसली आहे. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊननंतर आर्थिक तोटय़ात गेलेली बाजारपेठ अद्यापही सावरलेली नाही. मागील वर्षाची तूट भरुन काढण्यासाठी अतिरिक्त माल मागविण्याचे धाडसही करणे व्यापारी टाळत आहेत. अशातच बसचा संप सुरुच राहिल्यास आणखी अधिक परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक फटका
ग्रामीण भागात बुधवारी व गुरुवारी सकाळपासूनच बस फिरकल्याच नाहीत, त्यामुळे प्रवाशाना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. गावातून येणाऱया मालवाहतूक वाहनामध्ये प्रवासी दिसून येत होते. मिळेल त्या दुचाकी व प्रवासी टेंपोतून अनेकजण खानापूरला येत होते. परिवहन सेवा ग्रामीण भागाची लाईफलाईन असून इतर कोणतीच प्रवासी सेवा नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. कोरोना संसर्ग वाढत असल्याने शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसचा फटका बसला नाही. बस कर्मचाऱयांचा संप असल्याने रात्री वसतीच्या ग्रामीण भागात जाणाऱया बसेस गेल्या नाहीत. गावाकडून तालुक्याकडे येणारा कामगार वर्ग मोठा असून कामासाठी असे लोक बस थांब्यावर खासगी प्रवासी बसची तासन्तास प्रतीक्षा करीत राहिले. अनेकानी ओळखींच्या व्यक्तीच्या दुचाकीवरुन खानापूरकडे येण्यास प्राधान्य दिले. पण सायंकाळी घरी परतण्यासाठी अशा लोकांची गोची झाली. तसेच बस थांब्यावर खासगी वडाप टेम्पोसाठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणारे काही ग्राहक खानापूरकडे आले नाहीत. त्यामुळे अनेक गावातील बसथांब्यावर शुकशुकाट पसरला.
बस परिवहनचा फटका विद्यार्थ्यांना
परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱयांनी बुधवारपासून बस बंद आंदोलन केले. त्यामुळे पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी सायंकाळनंतर अचानक बस बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाताना अडचणी आल्या. बस संपामुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पेपर रद्द झाल्यामुळे त्यांचाही हिरेमोड झाला आहे. बस बंदमुळे अजून काही दिवस परीक्षा पुढे ढकलल्यास पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. परिवहन महामंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी बस बंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे समजते.