खासदार संभाजीराजे यांची माहिती, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्रित येऊ शकतात तर आम्ही का नाही?
पुणे : संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर शनिवारी बैठक झाली
प्रतिनिधी / पुणे
बऱ्याच दिवसापासून ऍड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. ती आज झाली. यापूर्वीदेखील आम्ही अनेक वेळा भेटलो आहोत. मात्र, जातीय विषमता कमी होऊन बहुजन समाज एकाच छताखाली रहावा, या उद्देशानेच आज आम्ही एकत्र आलो. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते, तर आज मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र का येऊ शकत नाही, असा सवाल करत खासदार संभाजीराजे यांनी या भेटीमागचे कारण शनिवारी उलगडले.
खासदार संभाजीराजे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यात मराठा आरक्षणावर बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा मला आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सुरुवातीपासूनच बहुजन समाजाला आरक्षण दिले आहे. तर बाबासाहेब आबेडकरांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी इच्छा होती. राज्यातील अनेक पक्षाच्या नेत्यांना भेटलो आहे. शेवट प्रकाश आंबेडकरांसोबतच्या बैठकीने केला आहे. आता राज्यातील मुख्यमंत्री, प्रमुख नेते आणि खासदार यांच्यासोबत लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार यांचे राजकारण मी 40 वर्षांपासून जवळून पाहत आलो आहे. ते नेहमी नरो वा कुंजरोवाच्या भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच आरक्षणाबाबत भूमिका घेतील, असे वाटते. राज्यात राजकारणाला शिळेपणा आला आहे. त्यासाठी संभाजीराजेंनी पुढाकार घेतला, तर ताजेपणा येईल. मी राजकारणात अस्पृश्य आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य आहे. मला विनाकारण भाजपकडे ढकलत आहेत. पण मी संभाजीराजेंबरोबर आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राजसत्तेशिवाय प्रश्न सुटणार नाही : ऍड. आंबेडकर
मराठा आरक्षणासाठी दोनच पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे. दुसरा म्हणजे याचिका फेटाळली, तर दुसरी याचिका दाखल करणे. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.