कोरोनासंबंधात एम्सचे दिलासादायक प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाबाधितांपैकी किमान 85 टक्के लोकांची बाधा घरबसल्या बरी होते आणि त्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नसते, असे दिलासादायक प्रतिपादन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे (एम्स) संचालक डॉ. दिलिप गुलेरिया यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर अशा रूग्णांना रेमिडिसेव्हीर किंवा कोणत्याही प्रकारची स्टीरॉईड्स् देण्याचीही आवश्यकता नसते, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
बहुतेक कोरोना रुग्णांना सर्दी, खोकला, घशात खवखवणे, अंग दुखणे, ताप अशी लक्षणे दिसून येतात. तर काहींना जुलाब होतात. ही लक्षणे पाच ते सात दिवस दिसून येतात. बहुतेक रूग्णांचा संसर्ग पॅरासिटेमॉल, भरपूर पाणी पिणे, नेहमीचा हलका व्यायाम करणे, जीवनसत्वांच्या (व्हिटॅमिन्स) नेहमीच्या गोळय़ा घेणे आणि मुख्य म्हणजे सकारात्मक विचार करणे असा सुलभ उपायांनी नाहीसा होतो, अशी महत्वाची माहिती डॉ. गुलेरिया यांनी एका कार्यक्रमात दिली.
15 टक्के रुग्णांना उपचार
15 टक्के रुग्ण असे असतात की त्यांना अधिक उपचारांची आवश्यकता असते. काही रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते. तसेच त्यांना जास्त ताप असतो. अशांना रुग्णालयात आणून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते. मात्र, कोरोनाची प्रारंभिक लक्षणे दिसून आल्यावर चाचणी करून घ्यावी. तसेच चाचणी होऊन ती नकारात्मक येईपर्यंत स्वतःला इतरांपासून विलग ठेवावे. हे केल्याने कुटुंबातील इतरांना कोरोना होणार नाही, असे प्रतिपादन या कार्यक्रमात डॉ. शेट्टी यांनी माsिहती देताना केले.
ऑक्सीमीटरचा उपयोग
आज बहुतेकांच्या घरी ऑक्सीमीटर आहेत. ते विश्वासार्ह आहेत. दर सहा तासांनी त्यांचा उपयोग करून शरीरातील ऑक्सिजन पातळी पहावी. प्रथम पातळी पाहिल्यानंतर सहा मिनिटे चालावे किंवा हलका व्यायाम करावा. त्यानंतर त्वरित पुन्हा पातळी पहावी. ती 94 किंवा त्यापेक्षा जास्त असल्याने चिंतेचे कारण नाही. मात्र व्यायामानंतर ऑक्सिजनची पातळी यापेक्षा कमी होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. अशा स्थितीतील व्यक्तींवर वेळैवर योग्य उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले.