ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
हेरिटेजला कोकणीत दायज किंवा वारसा म्हटले जाते. त्याचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. वारसामध्ये अनेक गोष्टी येतात. बहुभाषिकता ही गोमंतकीयांच्या रक्तामध्ये आहे. गोमंतकीयांना विविध भाषेचे ज्ञान तर आहेच याचबरोबर शिस्तही माहिती आहे. बहुभाषिकता ही निसर्गाने गोव्याला दिलेली सुंदर भेट असल्याचे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांनी कांपाल येथील सूर्यकिरण हेरिटेज येथे आयोजित करण्यात आलेल्या गोवन हेरिटेज महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर रूक्मिणी गुहा, गोवा हेरिटेज ऍक्शन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. जॉर्सन फर्नांडिस, गोवा हेरिटेज ऍक्शन ग्रुपच्या उपाध्यक्ष हेता पंडित, प्रिथा सरदेसाई उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांच्याहस्ते गोवा हेरिटेज महोत्सवाचे तसेच परमळ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी हेता पंडित यांनी गोवन हेरिटेज ऍक्शन ग्रुपबद्दल माहिती दिली. गोव्याचा वारसा जपण्यासाठी हा ग्रुप मागील 22 वर्षे प्रयत्न करत आहे. सुमारे 20 वर्षानंतर हा महोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे हेता पंडित यांनी सांगितले.
निसर्ग, वैविधता येते. या वैविधतेतून येणारी एकता ही सांभाळली पाहिजे. धर्मानंद कोसंबी यांना विविध भाषेचे ज्ञान होते. कोकणी त्यांची मातृभाषा होती तर मराठीत त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांनी आपल्या जीवनात अनेक भाषा शिकल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर गोव्याला नवीन भाषिक संस्कृती मिळाली ज्यामुळे बहुभाषिकतेला प्रोत्साहन मिळाले. गोमंतकीयांनी अजूनपर्यंत संवादासाठी मातृभाषा म्हणून कोकणी भाषेला राखून ठेवले असल्याचे मावजो यांनी यावेळी सांगितले.
गोवन हेरिटेज महोत्सव हा दि. 19 रोजीपर्यंत कांपाल येथील लुईस गोम्स उद्यानात सुरू राहणार असून यात संस्कृती, खाद्यपदार्थ तसेच कलांचे दर्शन होणार आहे. पाच दिवसांच्या या महोत्सवात गोव्याची संस्कृती व वारसाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. सदर महोत्सवाचे कुणबी हे विशेष आकर्षण असणार आहे. या महोत्सवात विविध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
मला जेव्हा या महोत्सवासाठी आमंत्रण दिले गेले तेव्हा अनेकांनी म्हटले की हा महोत्सव रद्द होणार नाही ना. परंतु गोवा हेरिटेज ऍक्शन ग्रुपने असे काही केले नाही. अनुभवानुसार लाखो रूपये खर्च करून महोत्सव आयोजित केले जातात आणि नंतर आक्षेपावरून डी डी कोसंबीसारखा महोत्सव रद्द केले जातात. गोव्यात असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खात्री असल्याचे दामोदर मावजो म्हणाले.