शहरात प्रवेश करण्यासाठी दोनच मार्ग : भर उन्हात सगळय़ांचाच निघाला घाम
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात येण्यासाठी प्रमुख सहा मार्ग आहेत. त्यापैकी वाई, महाबळेश्वर, जावली, खंडाळा या तालुक्यातून येणाऱयांसाठी मोळाचा ओढा तर कोरेगाव, माण, खटाव, कराड, पाटण, फलटण या तालुक्यांतून येणाऱया लोकांसाठी बॉम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ रस्ता खुला केला आहे. मात्र, सकाळी शहरात येणाऱया वाहनांची संख्या वाढू लागल्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढवला. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहनेसुद्धा वेडीवाकडी मार्गक्रमण करीत असल्याने ट्रफिक जाम झाले होते. यामुळे भर उन्हात सगळय़ांचाच घाम निघाला. दरम्यान, अनावश्यक फिरणाऱयांवर कारवाई होणारच. त्यामुळे कोणीही विनाकारण वाहने घेवून घराबाहेर पडू नये, असे आवाहन अपर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी केले आहे.
करोना विषाणूमुळे उदभवणाऱया संसर्गजन्य आजारामुळे साताऱयाचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केले आहेत. परिणामी शहरात येणाऱया वाहनांची बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. सातारा शहरामध्ये कोरेगाव-सातारा या रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक व मेढा रस्त्यावरील मोळाचा ओढा येथून फक्त वाहने शहरात येण्यास व बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त सातारा शहरामध्ये येणारे इतर सर्व मुख्य रस्ते व इतर आत येणारे छोटे-छोटे रस्ते सातारा शहरात प्रवेश करण्यास व शहरातून बाहेर पडण्यास बंद केलेले आहेत.
सोमवारी या बदलत्या नियमाचा पहिलाच दिवस असल्याने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या झाली होती. याबाबत माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा शहर पोलीस तसेच शहर वाहतूक शाखेसह परिसरात धाव घेत वाहतूक कोंडी फोडली. त्यांनतर पाटील यांनी वाहनांची तपासणी करून बाहेर येण्याच्या कारणाची खातरजमा करण्याचे आदेश देत स्वत: उन्हात उभा राहून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली.
सोशल डिस्टिन्सचा उडाला बोजवारा
मात्र, यावेळी काही बेशिस्त नागरिकांनी खुष्कीचा मार्ग अवलंबल्यामुळे पोलिसांनी तोही रस्ता बंद केला. अशावेळी प्रवेशद्वारावर गर्दी होणे क्रमप्राप्त असले तरी पोलिसांनीच शारीरिक अंतर तोडून कर्तव्य बजावणे चुकीचे आहे. एकप्रकारे जिल्हाधिकाऱयांचा आदेश पायदळी तुडवण्याचाच अनुभव आला आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणे, संपर्क टाळणे खूप आवश्यक असून नागरिकांसह सर्वांनाच या गर्दीत धोका आहे याची जाणीव कधी होणार हा प्रश्नच आहे.
विनाकारण फिरणारांवर कारवाई होणारच
भर उन्हात झालेली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या अपर जिल्हा पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱयांच्या मदतीने बाँबे रेस्टारंट परिसरातील कोंडी सोडवली. यावेळी त्यांनी कडक तपासणीच्या सूचनाही दिल्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, वाहनांची तपासणी ही होणारच व कोणतेही अत्यावश्यक कारण नसताना रस्त्यावर आलेल्या वाहनधारकांवर कारवाई होणारच आहे. त्यामुळे कारणाशिवाय कोणीही नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.