खानापूर तालुक्यातील हिंदू संघटनांचे पंतप्रधानांना निवेदन : बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कडक पावले उचलण्याची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
बांगलादेशमधील मुस्लिमांकडून त्या देशात राहत असलेल्या हिंदू धर्मियांवर अत्याचार वाढले आहेत. यामुळे बांगला देशमध्ये आता हिंदू असुरक्षित असून त्यांना योग्य ते संरक्षण मिळावे यासाठी बांगलादेश सरकारला ताकीद द्यावी, असे निवेदन खानापूर तालुक्यातील हिंदू संघटनांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना खानापूर तहसीलदारांकरवी पाठविण्यात आले. तहसीलदारांना निवेदन सादर करण्यासाठी तालुक्यातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलसह तालुक्यातील हिंदू संघटनांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात लक्ष्मी मंदिरापासून झाली. मोर्चामध्ये हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा रस्त्यावरून जाताना बांगला देशचा धिक्कार असो, बांगला देशातील हिंदूंना संरक्षण द्या, अशा घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे येताच बजरंग दल तालुका प्रमुख नंदकुमार निट्टूरकर यांनी मोर्चाचा उद्देश विशद केला.
यावेळी बोलताना बजरंग दलाचे राज्य सचिव प़ृष्णा भट म्हणाले, बांगला देशमध्ये नवरात्रीच्या काळात दुर्गा पूजेनिमित्त घातलेल्या मंडपावर त्या देशातील मुस्लीम अतिरेक्यांनी अचानक हल्ले करून पेंडॉल उडवून दिले. दुर्गा मूर्तीचीही मोडतोड करून अनेक हिंदूंवर हल्ले करून त्यांना जखमी केले. त्यामध्ये ईस्कॉनच्या दोन स्वामीजींनाही मरण पत्करावे लागले. एवढेच काय, अनेक हिंदू मंदिरांची मोडतोड केली. यामुळे आता बांगला देशामधील अल्पसंख्याक हिंदू मोठय़ा संकटात सापडले आहेत. यामुळे त्या हिंदूंना आता संरक्षण मिळणे गरजेचे आहे. अत्याचार करणाऱयांवर बांगला देश सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. यापुढे देशात राहून देशाच्या विरोधी कारवाया करणाऱया देशद्रोही जनतेशी हिंदू धर्मियांनी कोणतेही व्यवहार करू नयेत, त्यांच्यावर बहिष्कार घालावा, असे आवाहन केले.
अत्याचार खपवून घेणार नाही
मोर्चाचे संयोजक पंडित ओगले म्हणाले, बांगला देशमधील हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कारणीभूत असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. या पुढे हिंदूंवरील कोणतेही अत्याचार आम्ही खपवून घेणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगला देशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बजरंग दल जिल्हा प्रमुख भावकाण्णा लोहार, तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल यांनीही आपले विचार व्यक्त करून बांगला देश सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. यानंतर तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांना पंतप्रधान व परराष्ट्र मंत्र्यांना पाठविण्यासाठी निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, बांगला देशमध्ये सुरू असलेले हिंदू धर्मियांवरील अत्याचार त्वरित थांबले पाहिजेत. अत्याचार केलेल्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे, तसेच जेवढय़ा मंदिरांची मोडतोड झाली आहे ती मंदिरे पूर्ववत बांधून द्यावीत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जातीनिशी लक्ष घालून बांगला देश सरकारला हिंदू धर्मियांना रक्षण मिळावे यासाठी ताकीद करावी, अशी निवेदनात विनंती करण्यात आली आहे.
यावेळी झालेल्या मोर्चात तालुक्यातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.