वृत्तसंस्था/ अबु धाबी
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथे इंग्लंड-बांगलादेश यांच्यातील सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत इंग्लंडने आपला पहिला सामना जिंकला तर बांगलादेशला पहिल्या सामन्यात लंकेकडून पराभव पत्करावा लागला. आता बुधवारच्या सामन्यात बांगलादेश संघासमोर इंग्लंडचे तगडे आव्हान राहील.
या स्पर्धेत झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी दर्जेदार कामगिरी करत विंडीजचा डाव 14.2 षटकांत अवघ्या 55 धावात उखडला होता. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाची गोलंदाजी अधिक भक्कम वाटते. अबु धाबीची खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल राहण्याची शक्यता असल्याने इंग्लंड संघात आणखी एका गोलंदाजांचा (मार्क वूड) समावेश होईल असे वाटते. हा सामना दुपारच्या सत्रात असल्याने उष्ण हवामानामुळे इंग्लंड संघाची दमछाक अधिक होण्याची शक्यता आहे. मात्र बांगलादेशच्या खेळाडूंना येथील हवामानाची समस्या राहील असे वाटत नाही. आतापर्यंत या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने नाणेफेक जिंकणारे संघ जिंकले आहेत.
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास बांगलादेशने 2007 पासून या स्पर्धेत सातपैकी केवळ सामना जिंकला आहे. बांगलादेश संघातील अनुभवी अष्टपैलू शकीब अल हसन, कर्णधार मेहमुदुल्लाह तसेच दास, सरकार यांना भक्कम फलंदाजी करावी लागेल. मात्र बुधवारच्या या सामन्यात बांगलादेशच्या तुलनेत इंग्लंडचे पारडे जड ठरु शकते. या संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडला अष्टपैलू स्टोक्स, आर्चर आणि सॅम करेन यांची उणीव निश्चितच भासेल.