वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेश संघाचा माजी कर्णधार मश्रफे मोर्तझाने बांगलादेश क्रिकेट मंडळावर नाराजी व्यक्त केली आहे. संघाचे कर्णधारपद भूषवित असताना आपल्याला बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून आपला आदर केला गेला नाही, असा आरोप त्याने केला आहे.
बांगलादेश संघाचे कर्णधारपद भूषवित असताना दोन मालिकांमध्ये आपली कामगिरी समाधानकारक झाली नाही. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून माझा वारंवार अपमान होऊ लागला. त्यामुळे मी खूपच निराश झालो. क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्यासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून माझ्यावर दडपण येऊ लागले, असा गौप्यस्फोट त्याने केला.
बांगलादेश संघाचे प्रतिनिधित्व करताना काही सामन्यांमध्ये माझी कामगिरी चांगली झाली होती. पण त्याचे कौतुक मंडळाकडून झाले नाही. क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी माझ्यासाठी मंडळाकडून निरोपाचा सामना भरविण्याची घाई केली गेली. त्यामुळे मी खूपच दुखावलो गेले, असे मोर्तझाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
क्रिकेटमधून मी निवृत्त होण्यापूर्वी मंडळाकडून माझ्यासाठी खास निरोपाचा सामना भरविण्याचे निश्चित केले होते. पण त्यानंतर द्विपक्षीय मालिकेतील एक सामना माझ्यासाठी निरोपाचा असल्याचा निर्णय मंडळाने घाईने घेतला होता. बांगलादेशमधील प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना मंडळाकडून पुरेसे मानधन दिले नाही, असेही मोर्तझा म्हणाला.
बांगलादेश क्रिकेट इतिहासामध्ये 36 वषीय मोर्तझा गाजलेला कप्तान म्हणून ओळखला जातो. 2019 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याला संपूर्ण स्पर्धेत केवळ 1 गडी बाद करता आला होता. बांगलादेशमध्ये माझ्यावर टीका होऊ लागली. पण मी या टीकाकारांकडे अधिक लक्ष दिले नाही. पैशासाठी मी कधीच क्रिकेट खेळलेले नाही, असे स्पष्टीकरण त्याने दिले. 2007 साली इंडियन क्रिकेट लीग स्पर्धेत खेळण्यासाठी मला कोटय़वधी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण मी ती नाकारली, असेही तो म्हणाला. 2019 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर पाक संघाविरुद्ध झालेल्या बांगलादेशच्या सामन्यानंतर मी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा अंतिम निर्णय घेतला होता, असेही त्याने येथे सांगितले.