धारवाड / वृत्तसंस्था
दुर्गापूजा महोत्सव काळात बांगला देशातील हिंदूवर झालेले हल्ले हे पूर्वनियोजित असून त्या देशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या विरोधातील कारस्थानाचा एक भाग आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक येथे होत असून त्यात बांगला देशातील या हिंसाचारासंबंधात निषेध प्रस्ताव शुक्रवारी संमत करण्यात आला.
केंद्र सरकारने बांगला देशशी त्वरित संपर्क करुन हिंदूंवरील हल्ले थांबविण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी दबाव आणावा. सर्व राजकीय माध्यमांचा उपयोग करुन तेथील हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यास त्या देशाच्या सरकाराला सांगावे. या हल्ल्यामुळे जगभरात हिंदूंच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या आहेत. याची जाणीव बांगला देश सरकारला करुन द्यावी, असे प्रस्तावात स्पष्ट केले आहे.
मानवाधिकार समर्थकांवर टीकास्त्र
भारतातील अल्पसंख्याकांच्या संदर्भात अतिसंवेदनशील असणारे तथाकथित मानवतावादी, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षतावादी बांगला देशात अल्पसंख्य असणाऱया हिंदूंच्या सुरक्षेच्या संदर्भात मात्र मूग गिळून गप्प आहेत. यातून त्यांचे ढोंगी तत्वज्ञान उघडे पडते. या संघटनांनी बांगला देशातील घटनांचा साधा निषेधही केलेला नाही. कट्टर धर्मवादी मुस्लीम शक्तींना बांगला देशसह जगात अन्यत्र कोठेही डोके वर काढू दिले जाऊ नये. या संघटनांकडून लोकशाही आणि मानवतावादाला सर्वात मोठा धोका आहे, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
इस्कॉनची प्रशंसा
बांगला देशातील हिंसाचाराचा बळी ठरलेल्या हिंदू समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या अनेक संघटनांचे संघाने कौतुक केले आहे. या संघटना आणि संस्थांमध्ये इस्कॉन, रामकृष्ण मिशन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी वेळी हिंदूंच्या पाठीशी उभे राहून स्पृहणीय कामगिरी केली आहे. यासंदर्भात संघ समाधानी आहे, असेही प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले.