येत्या 25 वर्षांमध्ये एकही हिंदू न उरण्याची शक्यता
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बांगला देश आणि पाकिस्तान या देशांमधील हिंदू अल्पसख्याकांची अवस्था दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे. पाकिस्तानातून हिंदूंचे उच्चाटन जवळपास झालेच आहे. बांगला देशातील हिंदूही मोठय़ा संख्येने भारतात पलायन करीत असून ही प्रक्रिया अशीच सुरू राहिल्यास येत्या 25 वर्षांमध्ये या देशात एकही हिंदू शिल्लक उरणार नाही, असा इशारा सेंटर फॉर डेमॉपेटिक प्लूरलिझम अँड हय़ूमन राईटस् (सीडीपीएचआर) या प्रसिद्ध संस्थेने दिला आहे.
या संस्थेने व्यापक सर्वेक्षण करून अहवाल बनविला असून त्यात या दोन देशांमधील हिंदूंच्या बिकट अवस्थेवर प्रकाश टाकला आहे. पाकिस्तानात आता हिंदू आणि शीख अल्पसंख्याकांची संख्या आता पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या केवळ 2.5 टक्के इतकीच उरली आहे. त्यांचे आयुष्य अतिशय कठीण आहे. एखाद्या युद्धासारख्या परिस्थितीत त्यांना जगावे लागते. हिंदू व शीख मुलींचे व तरूणींचे अपहरण आणि सक्तीचा विवाह व मुस्लीम धर्मात धर्मांतर या नित्याच्याच बाबी आहेत. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळेची लोकसंख्या लक्षात घेतली तर आज पाकिस्तानात हिंदू व शिखांची लोकसंख्या 3.5 कोटी असणे आवश्यक होते. तथापि, आज ती केवळ 60 लाख इतकीच आहे. हत्या, अपहरण, सक्तीचे धर्मांतर आणि धाकदपटशा यांमुळे हिंदू व शीख तेथे आता केवळ नावापुरते उरले आहेत.
बांगला देशातून पलायन
बांगला देशात स्वातंत्र्याच्या वेळी हिंदूंची संख्या 25 टक्के होती. ती आता अवघी 10 ते 11 टक्के उरली आहे. 1971 मध्ये भारताच्या सैनिकांनी आपले रक्त सांडून बांगला देशा स्वतंत्र केला. पण त्यानंतरही येथील हिंदू जनतेवरील अत्याचार थांबलेले नाहीत. 1971 मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी लाखो बांगला देशीय हिंदूंची हत्या केली तसेच महिलांवर निर्घृण बलात्कार केले. सध्याही स्थानिक मुस्लीम लोक आणि बांगला देशातील दहशतवादी इस्लामी संघटना यांचा दबाव आणि अत्याचार यामुळे हिंदू भारतात पलायन करीत आहेत. आतापर्यंत किमान दोन कोटी हिंदूंनी पलायन केले असावे असे या संस्थेचे अनुमान असून ते धक्कादायक आहे. अफगाणिस्तानातही हिंदू व शीखांची अशीच दुर्दशा झाली असून या देशात 1950 मध्ये सहा लाख हिंदू-शीख होते. आता केवळ 200 परिवार उरले आहेत. इंडोनेशियाततही हिंदू अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असून त्यांना छळले जात आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
तुलसी गॅबार्ड यांची टीका
अमेरिकेतील डेमॉक्रेटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गॅबार्ड यांनी बांगला देशात होणाऱया हिंदूंवरील अत्याचारांसंबंधात तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय समुदायाने या हिंदूंसाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी आतापर्यंत वारंवार केली आहे.