ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा बांग्लादेश सीमेवर अडकून पडलेला 3500 ट्रक शेतमाल आजपासून निर्यात होणार आहे. भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर अडकलेल्या शेतमाल वाहतुकीचा मार्ग खुला झाल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
लॉकडाऊन काळात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतमालाची बांग्लादेशला होणारी निर्यात ठप्प होती. नाशिक, निफाड परिसरातल्या शेतकऱ्यांचा द्राक्षे, टोमॅटो आणि कांद्यासारखा जवळपास 3500 ट्रक शेतमाल बांग्लादेश सीमेजवळ महादीपूर येथे अडकून पडला होता.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या प्रकरणात लक्ष घालून बांग्लादेश सरकारकडून वाहतुकीची परवानगी मिळवली. आजपासून (दि. 27) ही वाहतूक सुरू होणार आहे. त्यामुळे महादीपूर येथून हा शेतमाल आता बांग्लादेशातील शिवगंज बाजारपेठेत पोहचणार आहे. कोरोना संसर्गाचा धोका होऊ नये, यासाठी पूर्णपणे सॅनिटाईज करुन या कंटेनरची पुढची वाहतूक होणार असल्याचेही सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.