सरपंचांनी बोलावले तहसीलदारांना : ग्रामपंचायतीचे नियोजन फोल
प्रतिनिधी / बांदा:
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षतेच्या सूचना असतांनाच येथील सोमवारच्या आठवडा बाजारात नियम धाब्यावर बसवत वर्दळ सुरू होती. ना तोंडावर मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग असेच चित्र होते. भाजी व किराणा खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांच्या सूचनांकडेही नागरिक दुर्लक्ष करताना दिसत होते. सद्यस्थितीत अत्यावश्यक सेवेची वाहतूक सुरू असून नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी सूचनांचे पालन करणे गरजेचे होते. मात्र, अशी गर्दी केल्यानंतर आता पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागणार आहे.
ग्रामपंचायत व व्यापारी संघाने बैठक घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन करूनही सोमवारी आठवडा बाजारात ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी आवरताना पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकीनऊ आले. स्वतः तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी रस्त्यावर उतरत व्यापारी व ग्राहकांना नियम पाळण्याबाबत सक्त सूचना दिल्या.
‘कोरोना’चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर बांदा आठवडा बाजारासाठी स्थानिक प्रशासनाने नियमावली तयार केली होती. परप्रांतीय भाजी विक्रेत्यांना आठवडा बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच व्यापाऱयांनी ग्राहकांना आपल्या दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास भाग पाडावे. अन्यथा संबंधित व्यापाऱयांवर कारवाई करण्याचे ठरविण्यात आले होते. शहरात मास्क न घालणाऱयांवर 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. मात्र, सोमवारच्या आठवडा बाजारात बैठकीत केलेले सर्व नियोजन फोल ठरले.
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
शहरात कट्टा कॉर्नर, आळवाडी, गांधीचौक येथे लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. पोलीस नागरिकांना वारंवार सूचना करत होते. मात्र, गर्दीसमोर पोलिसांचे कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हॉस्पिटल कट्टा, खेमराज हायस्कूल रस्ता व पिंपळेश्वर चौक येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. शहरात एकही दुचाकी व कार यांना प्रवेश देण्यात आला नाही. तरीही लोकांनी चालत बाजारपेठ गाठत गर्दी केली.
तहसीलदारांनी दिली भेट
सरपंच अक्रम खान यांनीही शहरात फिरून ग्राहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, गर्दी वाढल्याने त्यांनी याबाबतची कल्पना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिली. खुद्द म्हात्रे यांनी बांदा बाजारपेठेत येत व्यापारी व नागरिकांना सूचना व नियमावली काटेकोर पाळण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदारांनी बाजारपेठेत फेरफटका मारला. मात्र, दुपारपर्यंत गर्दी कायम होती.