प्रतिनिधी / बांदा:
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळेच येथील पुरस्थितीत ग्रामीण भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचले. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी येथे केले. बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात श्री मिसाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, राजू धारपवार, राष्ट्रवादी महिला जिल्हा व्यापार उद्योग अध्यक्षा दर्शना बाबर-देसाई, अस्लम खतीब, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तीकार राजगुरू, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेम्बकर, संतोष जोईल आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बांदा, नेतर्डे, विलवडे येथील ५० हुन अधिक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अमित सामंत म्हणाले की, आम्ही केलेल्या प्रयत्नामुळे बांदा शहरात पूर अलर्ट देण्यासाठी चार दिवसांत सायरन बसविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षात येण्यासाठी युवक मोठ्या प्रमाणात प्रवेश करत असून भविष्यात राष्ट्रवादी पुन्हा जोमाने उभी राहील. याठिकाणी कार्यकर्त्यांचा सन्मान निश्चितच होईल. प्रास्ताविक पुंडलिक दळवी यांनी केले. आभार शैलेश लाड यांनी मानले.