आस्थापना कर्मचाऱ्यांना नोटीस
कोल्हापूर / प्रतिनिधी-
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या आस्थापना शाखेतील सर्वच कर्मचारी पाच वाजताच गायब झाले. असा प्रकार दररोजच होत असल्याच्या तक्रारी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्याकडे करण्यात आली. यावेळी साडे पाच वाजता तक्रार आल्यानंत सामान्य प्रशासनचे अधिक्षक राहूल मोरे यांना या विभागात भेट देण्याची सुचना देण्यात आली. यावेळी या विभागात एकही कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शणास आले. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. यावेळी कारण आहे ते आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांची दांडी. सध्या पाच दिवसाचा आठवडा सुरु आहे. यामध्ये सोमवारी सर्व कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी उपस्थितीत असतात असे गृहित धरुन लोक जिल्हा परिषदेला येतात. मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी येवूनही बांधकाम विभागाची आस्थापना शाखा दुपारनंतर रिकामीच असते, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी आडसूळ यांच्याकडे केली होती. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता अशीच तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे खात्री करण्यासाठी आडसूळ यांनी आपल्या दालनातील कर्मचाऱ्यास बांधकामच्या आस्थापना शाखेत पाठवत वस्तुस्थिती पाहण्यास सांगितले. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याला आस्थापना शाखा रिकामी असल्याचे पहायला मिळाले.
सामान्य प्रशासनच्या या कर्मचाऱ्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांना वस्तुस्थिती सांगितली. यावर त्यांनी अधिक्षक राहूल मोरे यांना या विभागात जावून कर्मचाऱ्यांची नावे आणि हजेरी पत्रक आणण्याची सुचना केली. यावेळी आस्थापना शाखेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस त्यांनी लागू केली.