लाल बावटा बांधकाम संघटनेचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर
बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये दिवाळी भेट द्या, बंद करण्यात आलेली मेडीक्लेम योजना सुरू करा, दुसर्यांची घरे बांधणार्या कामगारांना महामंडळाकडे शिल्लक असलेल्या 17 हजार कोटी रुपयात स्वत:चे घर बांधण्यासाठी साडेपाच लाख रूपये अनुदान द्या, यासह अन्य मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकापासून निघालेल्या मोर्चात तब्बल 10 हजार बांधकाम कामगार सहभागी झाले होते. पावणेदोन वर्षानंतर बांधकाम कामगारांच्या एकजुटीचा एल्गार कोल्हापूर शहराने अनुभवला.
निवेदनात म्हटले आहे, 60 वर्षांवरील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू करा. आरोग्य तपासणीच्या नावाखाली नोंदीत कामगारांची तपासणी करून अहवाल न देणार्या कंपणीचा ठेका रद्द करा. जोपर्यंत मेडिक्लेम योजना सुरू होणार नाही तोपर्यंत महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ द्यावा. 18 ते 60 वयोगटातील कामगारांना नैसर्गिक मृत्यू पाच लाख तर अपघाती मृत्यू लाभ दहा लाख रुपये द्या. नोंदीत महिला कामगारांना मातृत्व लाभ म्हणजे 6 महिने 3000 रुपये अनुदान मिळावे. 1 जुन 2021 रोजी मंडळाकडे कोविड अनुदानासाठी पाठवलेल्या यादीतील 4300 कामगारांच्या खात्यावर रक्कम वर्ग करा. नोंदीत कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी 1 लाख रुपये अनुदान द्या. बोगस बांधकाम कामगार नोंदणीला आळा घाला. यासह अन्य मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लाल शर्ट, लाल टोपी, लाल बावटा हातात घेऊन 10 हजारांपेक्षा जास्त महिला व पुरूष सहभागी झाले होते. `आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्चा खाली करा’, बांधकाम कामगारांकडून पैसे घेणार्या अधिकार्यांवर कारवाई करा. अशा घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव, प्रकाश कुंभार, भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, विक्रम खतकर, आनंदा कराडे, शिवाजी मोरे, बापू कांबळे, मोहनराव सुतार, पोपट कुरणे, नुरमहंमद बेळकुडे आदी उपस्थित होते.
कामगार नेत्यांनी आपल्या भाषणातून सरकारला दिला इशारा
बांधकाम कामगार मंडळाकडे 17 हजार कोटी शिल्लक आहेत. या निधीतून बांधकाम कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर 29 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा सर्व नेत्यांनी आपल्या भाषणातून दिला.
कामगारांचा जगसागर
बांधकाम कामगार आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याने मोर्चातील पहिला कामगार व्हिनस कॉर्नर येथे तर शेवटचा कामगार दसरा चौकात होता. त्यामुळे वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला होता. मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही होता. आपल्या मागण्यांसाठी कामगार तळपत्या उन्हात कामगार आयुक्त कार्यालयासमोर बसले होते. शाहुपुरी पहिली व दुसरी गल्लीत नेत्यांची भाषणे संपेपर्यंत कामगार रांगेत बसले होते.