कागदपत्रांची विचारणा करून अर्ज अडविण्याचा प्रकार : कर्मचाऱयांकडून पैशांच्या मागणीची तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
इमारत बांधकाम परवानगीसाठी अर्ज करताना विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, अर्ज केल्यानंतर मालमत्ता कर भरणा केल्याची माहिती घेण्यासाठी बांधकाम परवानगीचा अर्ज महसूल विभागात पाठविण्यात येतो. मात्र, घरपट्टी भरल्याची शहानिशा करण्यासाठी 15 ते 20 दिवसांहून अधिक कालावधी लागत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध कागदपत्रांची पुन्हा विचारणा करण्यात येत असल्याने अर्जदारांना ही प्रक्रिया डोकेदुखीची बनली आहे.
अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी महापालिकेकडून बांधकाम परवाना घेण्याची सूचना करण्यात येते. पण बांधकाम परवाना देण्यास विलंब केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. इमारत बांधकाम परवानगीकरिता अर्जासोबत विविध कागदपत्रांची जोडणी करणे बंधनकारक आहे. खरेदीपत्र, सीटीएस उतारा, खाडाखोड उतारा, आराखडा, विविध विभागांचे ना हरकत दाखले तसेच मनपाचा उतारा आणि घरपट्टी भरलेली पावती अशा विविध कागदपत्रांसह बांधकाम परवानगीकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केला जातो. त्यानंतर नगर योजना विभागाकडून अर्जाची चाचपणी करून आराखडय़ाची तपासणी केली जाते. सदर मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा केली आहे का? याची माहिती घेण्यासाठी महसूल विभागाकडे अर्ज पाठविण्यात येतात.
अधिकाऱयांकडून जाणिवपूर्वक विलंब मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा केली आहे की नाही? याबाबत शहानिशा करून अर्ज पुन्हा नगर योजना विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे. पण घरपट्टी भरणा केल्याची शहानिशा करण्यासाठी तब्बल 15 ते 20 दिवसांहून अधिक कालावधी लागत आहे. महसूल विभागात अर्ज पाठविल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा विविध कागदपत्रांची विचारणा करण्यात येत आहे. अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडूनदेखील कागदपत्रांची विचारणा करून अर्जदारांना त्रास देण्याचा प्रकार महसूल विभागातील अधिकाऱयांनी चालविला आहे. काही कर्मचारी अर्जदारांकडे पैशांची मागणी करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. वास्तविक पाहता केवळ घरपट्टीबाबत माहिती घेण्यासाठी अर्ज महसूल विभागाकडे पाठविला जातो. पण त्या ठिकाणी अनावश्यक माहिती विचारून अर्जदारांना जाणिवपूर्वक विलंब केला जात असल्याची तक्रार होत आहे. महसूल विभागात प्रलंबित असलेले बांधकाम परवानगीचे अर्ज तातडीने निकालात काढण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.