प्रतिनिधी/ सातारा
पालिकेत पदाधिकाऱयांना कोणी विचारेना अशी अवस्था हल्ली बनली आहे. काही विभागात अधिकारी आओ जाओ घर तुम्हारा हेच चित्र पहायला मिळत आहे. पदाधिंकारी मात्र नियमित येवून बसत आहेत. परंतु अधिकारीच केबीनमध्ये नसतात. याचाच प्रत्यय बुधवारी सकाळी बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांना आला. त्यांनी हालचाल रजिस्टर पाहिले अन् अवाक झाले. सकाळी येवून सह्या ठोकून गायब झाले होते. तर मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांची तर सहीच दिसत नव्हती. त्यामुळ त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नव्याने आलेले सर्वच सभापती कामकाजाकरता दररोज सकाळी नियमित पालिकेत येवून आपल्या केबीनमध्ये येवून थांबतात.नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरता कार्यतत्पर असतात. परंतु पालिकेचे अधिकारीच त्या पदाधिकाऱयांना न विचारताच गायब होतात. एकादा दुसरा विभाग सोडला तर सर्वच विभागाची ही ओरड आहे. सकाळी बांधकाम विभागात अभियंत्यांच्या केबीनला कडीकुलूप तर मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्या केबीनलाही कुलूप होते. सभापती मिलिंद काकडे हे आल्यानंतर त्यांच्याकडे समस्या घेवून काही नागरिक आले. त्यावर त्या सोडविण्याकरता त्यांनी बेल मारली तेव्हा शिपाई आला. शिपायांना विचारणा केली अभियंते कुठे आहेत?, साईटवर गेले आहेत, असे सांगितले. तेव्हा त्यांनी हालचाल रजिस्टर मागवून घेतले. पाहिले असता अभियंता शिंदे हे मालशे पुलाकडेच 10.50 ला गेले होते. असे लिहून त्या पुढे सही केली होती. तर मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील आणि अभियंता अनंत प्रभुणे या दोघांच्या नावापुढे महिरपी कंस करुन एमजीपी टीसी असे लिहिले होते. त्या दोघांच्या नावापुढे एकच सही आणि 11.30 ची वेळ टाकलेली दिसत होती. अभियंता साबळे यांच्या नावापुढे प्रभाग 8 मध्ये पाईप ड्रेनचे काम असे लिहून 11.35 अशी वेळ लिहून सही केली होती. त्यामुळे सभापतीं मिलिंद काकडे यांनीही नाराजी व्यक्त करत त्यांच्याकडे आलेल्या नागरिकांनाच थेट जलमंदिरलाच घेवून गेल्याचे समजले.