2.59 हेक्टर क्षेत्र निश्चित : 28 जानेवारीला काढली अधिसूचना
तेजस देसाई / दोडामार्ग:
जैविक विविधता अधिनियम 2002 अन्वये महसूल व वनविभागाने तालुक्यातील बांबर्डे येथील मायरिस्टीका हे क्षेत्र ‘जैवविविधता वारसा स्थळ’ म्हणून घोषित करण्यात आले. या भागाचे जीवशास्त्राrय व ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून सिंधुदुर्गातील हे पहिले स्थळ आहे. 2.59 हेक्टर क्षेत्र यासाठी निश्चित करण्यात आले आहे. 28 जानेवारीला याबाबत अधिसूचना काढण्यात आली.
या स्थळाविषयी माहिती देताना पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर म्हणाले, जेव्हा या पृथ्वीतलावर आदिमानवाचे आगमन झाले नव्हते, त्याच्या पूर्वीचे हे जंगल असून भारतात केवळ मोजक्याच ठिकाणी असे जंगल आढळते. दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे या महसूल गावात देवराईच्या माध्यमातून हेवाळेवासीयांनी या जंगलचे पिढय़ान्पिढय़ा संवर्धन व संरक्षण केले आहे. महाराष्ट्रातील आजपर्यंत आठ जैविक वारसास्थळांची घोषणा झालेली असून सिंधुदुर्गातील हे पहिलेच स्थळ आहे. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेला आणि तिलारीच्या खोऱयातील हा भूप्रदेश कधीकाळी जीवाश्मांनी युक्त होता. आजही त्याचे काही अवशेष तिलारीच्या खोऱयात आढळत आहेत.
उलटय़ा यू आकाराची मुळे
दलदलीच्या प्रदेशात इंग्रजीतल्या उलटय़ा ‘यू’ आकाराची मुळे असलेले हे जंगल महाराष्ट्रात प्रथमच आढळले आहे. कधीकाळी अशाचप्रकारचे जंगल रत्नागिरी जिल्हय़ात दापोली येथे होते. याची प्रचिती देणारे जीवाश्म घरासाठी खोदकाम करताना आढळले आहेत. परंतु अशाप्रकारचे जंगल आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्षातून केवळ एकदाच हेवाळेवासीय ग्रामस्थ शिमग्याच्या कालखंडात होळी घालण्यासाठी ‘कातळाची राय’ येथे जातात. हेवाळे हा महाराष्ट्रातील एकेकाळी सदाहरित जंगल असलेला पश्चिम घाटातला समृद्ध पट्टा आहे. या ठिकाणी आणखी एक देवराई असून संपूर्ण महाराष्ट्रात सीतेच्या अशोकासाठी
प्रसिद्ध असलेली ही देवराई आहे. याच गावात बांबर्डे येथे ‘कातळाची राय’ येथे असलेली ही देवराई जैविक संपत्तीचे आगर आहे. सकाळ-सायंकाळी या देवराईत ‘धनेश’ पक्षी वास्तव्यास असतो. त्याचप्रमाणे केवळ पश्चिम घाटात आढळणारा ‘मलबार ट्रीन’ या फुलपाखरासाठी प्रसिद्ध आहे.
देवराईत आढळले साम्य
केरी (सत्तरी) येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेच्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदूरकर यांनी आंबोली येथील दलदलीच्या जंगलाचे निरीक्षण केले होते. त्यांच्या तौलनिक अभ्यासानुसार त्यांना ‘कातळाची राय’ या देवराईत साम्य आढळले आणि त्यांनी ही बाब वनखात्याच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने नुकतीच ही अधिसूचना काढली असून लोकांच्या पारंपरिक हक्कावर कोणतीच गदा येणार नाही आणि लोकसहभागाने या वारसा स्थळांचा व्यवस्थित आराखडा तयार केला जाणार असल्याचे केरकर यांनी सांगितले.