महत्वाचे कोण पालकमंत्री की जिल्हाधिकारी
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा कोव्हिड रुग्णालयात बाऊन्सर्स नियुक्त करण्यात येत असल्याचे तरुण भारत ने प्रसिध्द केल्यानंतर एकच खळबळ उडाली. बाऊन्सर्स संस्कृतीशी फारसा संबंध नसलेल्या सातारकरांना कोव्हिड रुग्णालय व्यवस्थापनाकडून होणारी दहशत वाढल्याने सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी थेट कोव्हिड हॉस्पिटलमध्ये जावून आपला संताप व्यक्त केला. बाऊन्सर्स नेमून रुग्णांसह नातेवाईकांवर दहशत निर्माण करण्याचा डाव उधळून लावला. मात्र, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत असे काही करु नका, ही सातारची संस्कृती नाही असे सांगितले असताना देखील तिथे बाऊन्सर तैनात केले होते. पालकमंत्र्यांच्या आदेश महत्वाचा की जिल्हाधिकाऱयांचा असा प्रश्न सातारकरांना पडला असून पोलिसांवर गैरविश्वास दाखवून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गप्प कसे ? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सुरु झालेले जिल्हा कोव्हिड हॉस्पिटल ही सातारा जिल्हय़ाची अस्मिता आहे. तिथे कोणाताही अनुचित प्रकार घडलेला नसताना देखील आठमुठेपणाने हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अन पालकमंत्र्यांच्या सुचनेला कचऱयाचा डबा दाखवत 14 बाऊन्सर उभे केले. नुसतेच उभे केले नाहीतर तर त्या बाऊन्सर्सनी तिथे लगेच शिरजोरीही सुरु केल्याने मग सातारकरांच्या संतापाचा कडेलोट झाला. कोव्हिड डिफेंडर ग्रुपसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुण्याच्या हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करत असतानाच बाऊन्सर काढा, अन्यथा आमच्याकडे पैलवान आहेत, असा कडक इशारा दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय या इमारतीत सुरु होणार होते. मात्र, त्या अगोदर त्यांचे मावळे जगले पाहिजेत ही भूमिका जिल्हा प्रशासनाने कोटय़वधी रुपये खर्च करुन जिल्हा कोव्हिड हॉस्पिटल सुरु केले. तिथे हजारो रुग्णांवर उपचार होत असल्याने किरकोळ गोष्टीकडे जिल्हावासिय दुर्लक्ष करुन तिथे दिनवाणे चेहरे करुन उपचार, बेड मिळण्यासाठी रांगा लावत होते. तिथे हॉस्पिटल स्टाफ वा परिसरात उपचारावरुन तणाव निर्माण करणारी कोणतीही व कायदा, सुव्यवस्थेला आव्हान देणारी गोष्ट घडली नसताना सोमवारी बाऊन्सर आयात करण्यात आले.
ही बाब कळल्यानंतर ’तरुण भारत’ने यावर प्रकाशझोत टाकून हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या निर्णयावर झोड उठवली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांच्यापर्यंत बाऊन्सर नेमण्याचा निर्णय सातारकरांसाठी किती चुकीचा आहे याबाबत चर्चाही केली. त्यावर खुद्द पालकमंत्री बाळासाहेब पाटील ही साताऱयाची संस्कृती नाही, अशा प्रकारे बाऊन्सर नेमू नका अशा सूचना केल्या.
मात्र तरी देखील मंगळवारी कोव्हिड हॉस्पिटल व्यवस्थापनाने नेमलेले बाऊन्सर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून उभे करत मनमानी सुरु केली. हॉस्पिटल परिसरातील गाडय़ा बाहेर काढल्या. नातेवाईकांना त्यांच्या रुग्णांना घरचे जेवण देण्यापासून रोखले. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यावरच प्रतिबंध करण्यात आल्याने मग सातारकरांचा सयंम तुटला आहे.
महत्वाचे कोण पालकमंत्री की जिल्हाधिकारी
सध्या कोरोनाने जिल्हा पॅनिक झालाय. मृत्यूसत्र थांबेना, बाधित वाढ कमी होईना. अशा स्थितीत रुग्णांवर उपचार, योग्य मार्गदर्शन, दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, कोव्हिड हॉस्पिटल व्यवस्थापनाने बाऊन्सर प्रवेशद्वारावरच उभे करत दंडेलशाही सुरु केली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी असे काही बाऊन्सर्स नेमू नका असा आदेश दिला तर जिल्हाधिकारी शेखर सिंह बाऊन्सर्स हवे म्हणतात मग महत्वाचे कोण पालकमंत्री की जिल्हाधिकारी, असा सवाल सातारकरांना पडला आहे.
वशिलेबाजी, हेळसांडीचा झाला आरोप
आरोग्य विभाग व डॉक्टर्स सध्या कोरोना बाधितांसाठी देवदूत असल्याचे सातारा जिल्हावासिय मानत आहेत. त्यामुळे काहीही समस्या आली तरी त्यावर शांतपणे तोडगा काढून उपाय योजना केल्या जात आहेत. जिल्हय़ात कोठेही आरोग्य विभागाला कोणीही त्रास दिला नाही. जिल्हा कोव्हिड रुग्णालयाच्या कामाचेही सामाजिक कार्यकर्ते कौतुकच करत त्यांच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, पुणे जिल्हय़ातील रुग्णांना थेट दाखल करुन घेवून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याचा प्रकार सुरु असून या वशिलेबाजीचा थेट आरोप करण्यात आला.