जम्बो हॉस्पिटल व्यवस्थापनाचा निर्णय चुकीचा- पालकमंत्री आल्यावर चर्चा करणार
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील जम्बो हॉस्पिटलमध्ये बाऊन्सर नेमल्यानंतर त्याचे सातारकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तो जिल्हाधिकाऱयांपर्यंत पोहोचल्यानंतर शेखर सिंह यांनी बाऊन्सरचा ड्रेसकोड बदलला. आता साध्या वेशात बाऊन्सर असले तरी अद्यापही त्यांना काढून टाकावे, अशी सातारकरांची मागणी असून त्यावरुनच खुद्द गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील माध्यमांशी बोलताना बाऊन्सर नेमण्याच्या कृतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
बाऊन्सर नेमल्याने त्याबाबत काही संघटना मला भेटल्या. तिथे बाऊन्सर का नेमलेत हेच मला कळत नाही असे सांगत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र पोलीस हे 24ƒ7 नेहमीच सतर्क असते. त्यामुळे हा पोलीस दलावर व्यवस्थापनाकडून अविश्वास दाखवण्यात येतोय हे अत्यंत चुकीचे आहे. याबाबत मी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जम्बो हॉस्पिटलवर डॉक्टर व स्टाफबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांनी राग व्यक्त केल्याच्या घटना घडल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे व्यवस्थापनाने त्यांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नेमले आहेत असे सांगितलेय.
तसेच मी याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याशी चर्चा केली. वास्तविक महाराष्ट्र पोलीस हे कोणत्याही स्थितीला तोंड द्यायला, कोणत्याही बिकट परिस्थितीला सामोरे जायला नेहमीच सज्ज असतात. सर्वांची सुरक्षा करण्यास महाराष्ट्र पोलीस दल सक्षम आहे. त्यामुळे हॉस्पिटलवर बाऊन्सर नेमण्याची काहीच गरज नव्हती. आमचे सातारा पोलीस दलातील जवान तिथे तैनात आहेत. मात्र, प्रवेशद्वारावर आहेत. ते हॉस्पिटलमध्ये जावू शकत नाही. तरीही तिथे कोणता अनुचित प्रकार घडल्याबाबत पोलिसांनीही काहीही सांगितले नाही. मग हॉस्पिटल व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवीच असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
कपडे निघाले, आता बाऊन्सरही निघतील
जम्बो हॉस्पिटलवर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. तसेच व्यवस्थापन नातेवाईकांकडून डॉक्टर्स, स्टापला त्रास झाल्याचे म्हणत असेल त्यांनी तातडीने त्याच वेळी पोलिसांकडे तक्रार का केली नाही. पोलीसांनी त्याच वेळी तिथे सर्वांना समज दिली असते. मात्र, बाऊन्सर नेमणूक हॉस्पिटलच्या आवारात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. येणाऱया रुग्णास आता घेवून त्याच्या स्थितीनुसार उपचार महत्वाचे असताना आणि हॉस्पिटलमध्ये चांगले काम सुरु आहे असे व्यवस्थापनाचे म्हणणे असेल तर बाऊन्सर नेमण्याची गरजच नव्हती, असे सातारकरांचे अजूनही म्हणणे आहे.
पालकमंत्री आले की या निर्णय घेवू सध्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे मुंबईत आहेत. ते दोन दिवसात येतील. ते आले की मग त्यांच्यासह जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमवेत बैठक घेवून जम्बो हॉस्पिटलमधील बाऊन्सर नेमण्याच्या प्रकाराबाबत चर्चा करणार आहे. रुग्ण, नातेवाईकांवर दबाव आणण्याचा हा प्रकार असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले