मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. तशाच प्रकारे कोरोनाच्या संकटाचेही आहे. मुळात, कोरोना हा एक कॉमन कोल्ड आहे. कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दीचा आजार! अनेक ग्रंथांमध्ये त्याची ओळख कॉमन कोल्ड या नावाखालीच दिलेली आहे. हा आजार आतापर्यंत अनेकांना कितीतरी वेळा होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल.
- हे मी माझ्या मनाचे सांगत नाही. पद्मश्री डॉ. रमण खंडेलवाल यांची मी मुलाखत घेतली होती. ते याच क्षेत्रात काम करतात. त्यांनी कोरोना विषयी खूप छान तथ्यात्मक माहिती सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या व्हायरसची जरी लागण झाली तरी 80 टक्के लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तो आजार येतो आणि चार-सहा दिवसांमध्ये आपोआप निघूनही जातो. 15 टक्के लोकांना सामान्य उपचारांची गरज भासते. तेही साध्या उपचाराने बरे होऊ शकतात. पाच टक्के लोकांच्या बाबतीत मात्र कॉम्प्लेक्स निर्माण होऊ शकतो. पण हे पाच टक्के लोक म्हणजे जे वयोवृद्ध आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती अगदी मामुली आहे, ज्यांना डायबिटीस, हृदयविकार, टी.बी. किंवा तत्सम स्वरूपाचा पूर्वीचाच कुठला तरी आजार आहे. अशा लोकांपैकी काही लोक मरू शकतात.
- हे आहे कोरोनाचे सत्य. म्हणजे सुमारे 95 टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता जवळ जवळ नगण्य आहे. साध्या उपचारानेही तो बरा होऊ शकतो.
- मुळात, व्हायरस हे जिवंत व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे त्याला मारू शकत नाही. तो शरीरात गेल्यानंतरच जैविक लक्षणे दाखवतो. आपण व्हायरसपासून पळून जाऊ शकत नाही. घरात कोंडून घेतले तरी आपल्या घरात आपल्या आसपास हजारो-लाखो व्हायरस वावरत असतात! खरे तर व्हायरस हा आपला निसर्गातील एक सोबती आहे, सहचारी आहे. मग आपण काय करायचे? आपण जसे पडणार्या पावसाला थोपवून धरू शकत नाही. तसे व्हायरसला थोपवू शकत नाही. मग पावसापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करतो? आपण छत्रीचा वापर करतो. नेहमीसाठी घर बांधून ठेवतो. जेव्हा लढाई सुरू असते तेव्हा आपल्यावर वार होऊ नये म्हणून आपण काय करतो? आपण ढालीचा वापर करतो आणि आलेला वार त्याच्यावर झेलतो. तसेच व्हायरसचा मार झेलण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती नावाची जी ढाल आहे, तिचा वापर करणे हाच याचा प्रथम आणि शेवटचा सर्वोत्तम उपाय आहे.
- कुठलाही आजार हा औषधाने बरा होत नाही. कारण आपण औषधे खात नाही, म्हणून आजार होत नाही, तर आजाराची कारणे अन्यत्र असतात. शरीर स्वतःहूनच आजार बरा करीत असते. त्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करीत असते. तिला बलवान बनवणे हे आपल्या हातात आहे. जर युद्ध जिंकायचे असेल तर सैनिकीशक्ती बलवान करावी लागते. तिला योग्य ती हत्यारे व रसद पुरवावी लागते. तसेच शरीराचे आहे. शरीरातील सैनिकी शक्ती बलवान बनवा.
- मित्रांनो! आपण माणूस आहोत. माणसाने वेळोवेळी अनेक संकटाशी मुकाबला करीत स्वतःचे अस्तित्व इथंपर्यंत आणलेले आहे. आताही आपण एकोप्याने, एकदिलाने वागून एकमेकाला मदत करीत जगूया. माणसाशी माणसाप्रमाणे जगणे आणि निसर्गाची होणारी लूट थांबवणे, एवढे जरी झाले तरी कोरोनाने शिकवलेला तो एक धडा आहे असे म्हणावे लागेल. स्वस्थ रहो! मस्त रहो!! व्यस्त रहो!!!
डॉ. राजेंद्र गाडेकर