पारंपरिक शेतीला झेंडू फुलांच्या शेतीची जोड : अनेक तरुण वळले शेती व्यवसायाकडे
आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील 70 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र, अलीकडे तरुण वर्ग कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहे. शेतात काम करणे त्यांना नकोसे वाटत आहे. छोटा-मोठा व्यवसाय, नोकरी याकडे तरुणाईचा कल अधिक वाढलेला आहे. मात्र साऱयांनाच नोकऱया मिळणार कुठून आणि वडिलोपार्जित असलेली शेती करायची कुणी? असा प्रश्नही उपस्थित होतो. याचाच विचार करून पश्चिम भागातील बाकनूर गावातील काही तरुणांनी झेंडू फुलशेती करण्याचा निर्णय घेतला असून गेल्या पाच-सहा वर्षांपासून या गावात ही शेती करण्यात येत आहे.
पारंपरिक शेतीवर जगणं आता अशक्यप्राय झाले आहे. याला कारणेही अनेक आहेत. अत्यल्प असणारी सुपीक जमीन, पाण्याचे कमी असलेले स्त्राsत, खतांच्या वाढत्या किमती यामुळे शेती करणे दिवसेंदिवस बिकट होत चालले आहे. यामुळे तरुणाईचा कल शेतीकडे दिसून येत नाही. मात्र, पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देऊन हंगाम, हवामान, पिकाची निवड, बाजारभाव याचा अभ्यास करून शेती केल्यास नक्कीच फायद्याची ठरु शकते. याचे उत्तम उदाहरण बाकनूर गावातील काही तरुणांनी दिले आहे.
गावात सुमारे 25 शेतकऱयांनी शेतशिवारांमध्ये झेंडूची लागवड केली. ही लागवड साधारणतः जुलै महिन्यात नागपंचमीला केली. बहुतांशी शिवारातील झेंडू फुलांची काढणी पूर्णत्वास आली आहे. शेवटची एक-दोन काढणी इतकीच शिल्लक आहे. दसरा आणि दिवाळीच्या सणात झेंडू फुलाला मागणी मोठय़ा प्रमाणात असते. दरवर्षी हा दसरा-दिवाळीचा हंगाम साधता येईल, अशा रितीने झेंडूच्या रोपांची लागवड करण्यात येते, अशी माहिती येथील शेतकऱयांनी दिली.
झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनीत आणि निरनिराळय़ा प्रकारच्या हवामानात उत्तम घेता येते. हलकी व मध्यम पाण्याचा निचरा होणारी जमीन झेंडूच्या पिकास उपयुक्त ठरते. या शिवारातील लाल मातीची जमीन लागवडीसाठी उत्तम ठरत असून इथले हवामानही पोषक ठरत असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली.
लालसर मातीमध्ये नांगरण करून उत्तम प्रकारे मशागत करण्यात आली. त्यानंतर बैलांच्या साहाय्याने चार फुटाला एक अशी आळी मारण्यात आली व सव्वा फुटाला एक झेंडूचे रोपटे याप्रमाणे लागवड केली.
उष्ण, कोरडय़ा तसेच दमट हवामानात चांगले पीक वाढते. मात्र, अती थंडीमुळे झेंडूच्या झाडांचे आणि फुलांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. जास्त तापमानामुळे झाडाची वाढ खुंटते. पश्चिम भागातील हवामान झेंडू पिकास फायदेशीर असल्याने झेंडू लागवड करणे उपयुक्त ठरत आहे, अशी माहिती शेतकऱयांनी दिली.
या गावातील सर्रास शेतकऱयांनी कागल येथून झेंडूची रोपटी विकत आणले आहेत. पिवळय़ा रंगाची फुले लागणाऱया झेंडूच्या रोपटय़ाची किंमत 2.50 रु. तर केशरी रंगाचे फूल लागणाऱया झेंडूच्या रोपटय़ाची किंमत 1 रुपये 70 पैसे याप्रमाणे शेतकऱयांनी रोपटय़ांची खरेदी केली, अशी माहिती विठ्ठल सावंत यांनी दिली.
झेंडू रोपाची लागवड करण्यापूर्वी अळय़ांमध्ये शेणखत व पोल्ट्री फार्म येथून आणलेले खत, त्याचबरोबर रासायनिक खत घालण्यात आले. लागवडीनंतर 15 दिवसांनी उगवलेले तण काढून भांगलण करण्यात आली. 20 ते 25 दिवसानंतर माणसांच्या साहाय्याने कोळपणी केली. 22 ते 25 दिवसानंतर बैलजोडीने झेंडूच्या रोपांना नांगराने भरती देण्यात आली. लागवड केल्यानंतर 40 ते 45 दिवसांनी फुलांची तोडणी करण्यात आली. पहिल्या तोडीला फुले कमी प्रमाणात मिळतात. त्यानंतर मात्र प्रत्येक तोडीच्या वेळी फुलांच्या संख्येत बरीच वाढ होते.
बाकनूर गावातील शेतकरी भात, बटाटा, रताळी, भुईमूग, ऊस, नाचना आदी पिके घेतात. या पिकाबरोबरच अलीकडे झेंडूचे उत्पादन घेत आहेत.
प्रशासनाकडून सहकार्याची गरज
शेतशिवारात राबणाऱयांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. बाकनूर सारख्या गावातील तरुण शेतकरी आपल्या शेतशिवारामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा तरुण शेतकऱयांना प्रशासनाकडून विविध योजना मिळायला हव्यात, मिळायला पाहिजेत. त्यांना प्रशासनाकडून सहकार्य मिळण्याची गरज आहे.
शेतकऱयांसाठी आर्थिक हातभार लावणारी झेंडू शेती : विठ्ठल सावंत
झेंडू फुलाची शेती ही शेतकऱयांसाठी आर्थिक हातभार लावणारी शेती आहे. झेंडू पिकाची लागवड, त्याची देखभाल कशी करायची याची माहिती अगोदर उपलब्ध होणे गरजेचे आहे. पहिल्या वर्षी झेंडूची शेती करताना बऱयाच अडचणींचा सामना करावा लागला. आता मात्र फूल शेती कशी करायची याची पूर्णतः माहिती मिळाली असल्यामुळे दरवर्षी झेंडू रोपटय़ांची लागवड शिवारात करतोच. दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत झेंडूला 120 रुपये ते 150 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. या पाच गुंठय़ाच्या शेतीतून 70 हजारांचा नफा मिळाला. आमचा शेती हाच पारंपारिक व्यवसाय असून भात, मिरची, ऊस आदी पिके आम्ही घेतो.
शिवारामध्ये तरुणांनी बिनधास्तपणे कष्ट केले पाहिजे : रामू मजुकर
सध्या साऱयांनाच रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे जर वडिलोपार्जित शेती असेल तर आपल्या शिवारामध्ये तरुणांनी बिनधास्तपणे कष्ट केले पाहिजे. कारण बळीराजा हा या देशाचा कणा आहे. शेतात काम करण्याची, राबण्याची एकदा सवय लागली की शेतीकामामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होऊ शकतो. शेतातील 10 गुंठय़ामध्ये झेंडूची लागवड केली आहे. ही लागवड नागपंचमीच्या दरम्यान केली होती. यामध्ये शेणखत, पोल्ट्री खत, रासायनिक खत घालण्यात आले आहे. दसरा आणि दिवाळीला झेंडू फुलाला बऱयापैकी दर मिळाला. सध्या मात्र झेंडूला 40 ते 50 रुपये प्रति किला याप्रमाणे दर मिळत आहे. 10 गुंठय़ामध्ये सुमारे 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.