वार्ताहर / बागणी
येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील मारुती मंदिरात आष्टा पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सरपंच संतोष घनवट, उपसरपंच विष्णु किरतसिंग, सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. लक्ष्मणराव माळी, प्रमोद माने, शिवाजीराव आपुगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बागणी, काकाचीवाडी, रोझावाडी, फाळकेवाडी गावातील सर्व गणेश मंडळांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे म्हणाले प्रत्तेक वेळचे वातावरण हे वेगळे असते चालू वर्षीचे कोरोना संकटामुळे वेगळे आहे. लोकांची गर्दी ही होणारच त्यामुळे आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे त्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. सरपंच घनवट व सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. माळी म्हणाले कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. आपण गर्दी होणार नाही म्हणत असतो पण कोणीही नियम पाळत नाहीत त्यामुळे सर्वांच्या हिताचा निर्णय म्हणून चालू वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्तेक मंडळाने चालू वर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचे हमी पत्र लिहून दिले. सामाजिक उपक्रम राबवण्याचे यावेळी मंडळातील कार्यकर्त्यांनी कबूल करत मास्क, सॅनिटायझर व गरजू कुटुंबाला अन्न धान्याची मदत करणार असल्याचे देखील यावेळी युवकांनी जाहीर केले. यावेळी माजी सरपंच राजेंद्र पवार, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप कोळी, संतोष शेळके, महादेव पाटील, इर्शाद सुतार, सागर गायकवाड, अमर पाटील, पोलीस पाटील अशोक मालेकर, सहाय्यक पोलीस फौजदार संजय सनदी, मारुती बामणे, कोतवाल बाळू भोई मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.