वेंगुर्ल्यात आंबा-काजू बागायतदार, प्रक्रिया उद्योजकांची बैठक : काजू 120 रुपये दराने खरेदी करावी – बागायतदारांची मागणी
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हय़ातील काजू बीचा दर ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत काजू दराबाबत काजू कारखानदार व काजू बागायतदार यांच्यामध्ये एकमत न झाल्याने वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी काजूचा दर एwच्छिक ठेवला. या सभेत आंबा कॅनिंग 50 रुपयेने घेण्यात यावे, अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली.
दोन दिवसांपूर्वी वेंगुर्ले येथे आंबा, काजू बागायतदार, काजू कारखानदार व आंबा कॅनिंग खरेदीदार यांच्यासोबत पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी काजू बी तसेच आंबा कॅनिंगचे दर निश्चित करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार मंगळवारी येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात जिल्हय़ातील आंबा बागायतदार, काजू बागायतदार, काजू कारखानदार व कॅनिंग खरेदीदार यांची बैठक वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.
यावेळी वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत, वेंगुर्ले मुख्याधिकारी वैभव साबळे, महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सेक्रेटरी बिपीन वरसकर, खजिनदार श्रीकृष्ण झांटये, दीपक ठाकुर, उमेश येरम, आंबा बागायतदार नितीन कुबल, जयप्रकाश चमणकर, विलास ठाकुर, नगरसेविका पूनम जाधव तसेच राजू पांगम, जनार्दन पडवळ आदी उपस्थित होते.
यावेळी काजू कारखानदारांतर्फे महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर म्हणाले, काजू बीची खरेदी व्यापाऱयांकडून बंद आहे. काजू बागायतदारांकडील काजू खरेदी करून ती प्रक्रिया उद्योजकांकडे आणून देण्यास काजू व्यापाऱयांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करुन शहरी भागातील आठ काजू खरेदीदारांची लिस्ट तहसीलदारांकडे सादर केली. वेंगुर्ले मार्केटमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काजू खरेदी करणे शक्य होणार नसल्याने काजू खरेदीदारांनी न. प. मुख्याधिकारी यांच्याकडून पास द्यावेत व कॅम्प स्टेडियम येथे सकाळी 8 ते 12 या वेळेत काजू खरेदी करावी. तसेच ग्रामीण भागातील काजू खरेदीदारांनी ग्रा. पं. कडून पास घेऊन सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून गावांमध्ये काजू खरेदी करावी, असे तहसीलदार यांनी सांगितले.
काजू दराबाबत कारखानदार, बागायतदारांमध्ये दुमत
काजू बीचा दर हा मागणी व पुरवठा यावर अवलंबून असतो. सद्यस्थितीत कुठेही मागणी नसताना किंवा पुढील चार महिन्यात मागणीत वाढ होण्याचा कोणताही आधार नसताना काजू बीचा दर निश्चित करणे कठीण आहे. जागतिक बाजारपेठेत काजू बी खूप मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काजूगराची मागणी फारच कमी आहे. महाराष्ट्रात दोन लाख 50 हजार मॅट्रीक टन एवढा काजू तयार होतो. शासनाने उद्योगाला परतावा योजना दिल्यामुळे काजू बीचे दर वाढत गेले होते. आज काजू बी व काजूगरावर टॅक्स लागल्यामुळे व परतावा योजना बंद झाल्यामुळे उद्योगाला अतिरिक्त कोणताही फायदा नसल्यामुळे काजूगराच्या मागणीप्रमाणे काजू बीचे दर राहतात. त्यामुळे काजू कारखानदार दोडामार्ग ते बांदा 100 रुपये, सावंतवाडी 95 रुपये, कुडाळ-कणकवली 90 रुपये व अन्य ठिकाणी प्रतवारीप्रमाणे 80 ते 85 दरांने काजू व्यापाऱयाकडून काजू खरेदी करतात. हेच दर कारखानदारांना सद्यस्थितीत परवडतात. काजूगराला मागणी वाढल्यास दर वाढवू शकतो, असे यावेळी सुरेश बोवलेकर यांनी काजू कारखानदारांच्यावतीने सांगितले. तर काजू बागायतदार विलास ठाकुर, जयप्रकाश चमणकर यांनीही काजू बागायतदारांना काजू उत्पादनाचा वाढता खर्च लक्षात घेता आपल्याकडील काजू बी काजू व्यापाऱयांना 70-80 दराने देणे परवडत नसल्याने ती 100 ते 120 रुपये दराने खरेदी करण्यात यावी, अशी मागणी केली. काजू कारखानदार व काजू बागायतदार यांच्यामध्ये काजू दराबाबत सुवर्णमध्य न निघाल्याने तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सद्यस्थितीत ज्यांना हे दर परवडतात त्यांनी विक्री करावी. इतरांनी काजू दर वाढल्यानंतर आपल्या काजू बीची विक्री करावी, असे सांगितले.
या बैठकीस आंबा कॅनिंग खरेदीदार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कोणीही कॅनिंग खरेदीदार उपस्थित न राहिल्याने आंबा कॅनिंगचा दर निश्चित झाला नाही. मात्र, यावेळी उपस्थित आंबा बागायतदारांनी आंबा कॅनिंगला 50 रुपये दर मिळावी, अशी मागणी केली.
कृषी मालाच्या वाहतुकीसंदर्भात काही अडचणी आल्यास 18001804200, 18001814488 या टोल फ्री नंबरवर किंवा 9423090301 वर संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार यांनी यावेळी केले.