फलोत्पादन खात्याची योजना, फळबाग पिकांना मिळणार संरक्षण
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत पिकांना अधिक संरक्षण मिळावे, याकरिता कर्नाटक रयत सुरक्षा प्रधानमंत्री फसल विमा योजनेतंर्गत रब्बी हंगामासाठी जिल्हय़ातील बागायत पिकांना विमा योजनेसाठी अधिसूचना लागू करण्यात आली आहे. अलिकडे बदलत्या हवामानाचा बागायत शेतीला मोठा फटका बसत आहे. यासाठी खात्याने बागायत शेतीला विमा योजना लागू केली आहे.
जिल्हय़ातील कांदा, टोमॅटो, मिरची, आंबा, काजू इतर बागायत पिकांसाठी विमा योजना लागू केली आहे. जिल्हय़ातील बेळगाव, अथणी, सौंदती, बैलहोंगल आदी तालुक्मयाच्या यामध्ये समावेश आहे. प्रतिहेक्टर कांदा पिकांसाठी 3750, टोमॅटो 5900, बटाटा पिकांसाठी 4524, आंबा 4000, तर हिरव्या मिरचीसाठी 3550 विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. जिल्हय़ात जूलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बागायत शेतीची प्रचंड प्रमाणात फटका बसला असून साधारण 3741 हेक्टरमधील बागायतशेतीचे नुकसान झाले होते. बागायत शेतकऱयांना कांदा, डांळिब, टोमॅटो, मिरची, केळी, फळे, पपई, पेरू, बटाटा, वांगी, कोबी, गाजर, मका आदी पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे खात्याने बागायत पिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून विमा योजना हाती घेतली आहे. अलिकडे जिल्हय़ात फळ बागायत शेतीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला फटका बसत आहे. विमा योजनेसाठी संबंधित बागायतदार शेतकऱयांनी तालुका फलोत्पादन खात्याच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.