प्रतिनिधी/ बेळगाव
बस बंदचा फटका मागील शनिवारच्या आठवडी बाजाराला बसला होता. मात्र, या शनिवारच्या आठवडी बाजारात जोरदार तेजी दिसून आली. भाजीपाल्यापासून इतर जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजार बहरला होता. विवाह सोहळय़ांसाठीचे साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी होती. यामुळे बाजारपेठ फुल्ल झाल्याचे दिसून आले. भाजी बाजारापासून, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्ली या भागात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी आणि त्यातूनच मार्गक्रमण करणारे ग्राहक असे चित्र अनुभवायला मिळाले.
भाजी बाजाराचा आढावा घेतला असता भाज्यांचे दर आवाक्यात आहेत. स्थानिक स्वरुपातील भाजीपाला मोठय़ा प्रमाणात दाखल होत असल्याने दर घसरत चालले असून परिणामी ग्राहकांना कमी दरात भाजी उपलब्ध होत आहे. मार्केटयार्ड येथील होलसेल भाजी मार्केटमध्येच भाजीपाल्याची आवक वाढत असून परिणामी दर घसरत चालले आहेत. यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून विक्री करण्यात येणाऱया भाजीचे दरदेखील कमी झाले आहेत. मागील महिन्यात वाढलेल्या भाज्यांमुळे महिलावर्गाचे आर्थिक बजेट कोलमडले होते. मात्र आता दर कमी झाल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
शनिवारच्या बाजारात मार्केडयार्डमधील दर पाहता कोबीचा दर घसरल्याचे दिसून आले. फ्लॉवर 50 रु. डझन, दोडकी 300 रु. दहा किलो, कारले 250 ते 300 रु., टोमॅटो 100 ते 120 रु. दहा किलो, गवार 250 रु., भेंडी 250 रु., मिरची 300 रु., वांगी 200 रु., वाटाणा 500 रु., नवलकोल 180 रु. तर पालेभाज्यांचे दरही कमी झाले असून शेकडा दर पाहता कोथिंबिर 400 रु., पालक 200 रु., लाल भाजी 300 रु., शेपू 400 रु., कांदापात 600 रु. असे दर असून यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच उतरले आहेत.
हरभरा वाटाणा तेजीत थंडीची चाहूल लागली की हरभरा, वाटाणा यांची आवक वाढते. यामुळे मुख्य बाजारपेठेत यांचे दर्शन घडले नसले तरी गल्लोगल्ली व चौकाचौकात ताजा हरभरा विक्रीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे. 10 ते 20 रु. जुडी याप्रमाणे ओला हरभरा विक्री केला जात आहे. याशिवाय बेळगावच्या भाजीचे वैशिष्टय़ असणारा लहान वाटाणादेखील शेतकरी वर्गाकडून विक्री केला जात असून शहापूर बाजारात प्रामुख्याने वाटाण्याची विक्री जोरदार होते. साधारण 100 ते 110 रु. किलो असा त्याचा दर असून इतर भाजीपाल्याबरोबरच या भाजीपाल्यालाही मागणी वाढली आहे.