जून महिन्याची सुरूवात भारतीय शेअर बाजारांसाठी सकारात्मक झाली आहे. गेल्या आठवडय़ात बाजारांनी 7 टक्के तेजी दर्शवली. तोच कल येणाऱया आठवडय़ातही दिसत आहे. ही बाजारांतील मरगळ संपण्याची सुचिन्हे आहेत. अर्थात बाजार एकदम उसळी मारणार नाही, पण बाजारांतील नकारात्मक भावना आता संपुष्टात येऊ लागली आहे आणि हे आशादायक आहे.
गेल्या आठवडय़ात शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक होते. सेन्सेक्सने 306 अंकांची तेजी दर्शवत 34,287.24 चा पल्ला गाठला तर निफ्टीने 113 अंकांची तेजी दर्शवत 10,142 पर्यंत मजल मारली. कोविड-19च्या महामारीने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झाली असताना शेअर बाजारांची कामगिरी तरी उत्साह वाढवणारी कशी असेल, या भावनेतूनच व्यवहार होत होते. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून संपूर्ण शेअर बाजारात अतिशय नकारात्मक आणि अनिश्चततेचे वातावरण पसरले होते. आता कोविड-19 ची भीती सरलेली नाही तरी त्याबाबत लोकजागृती झाली आहे. त्यामुळेच आता अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार या दोन्ही ठिकाणी असलेली मरगळ आता हळूहळू दूर होऊ लागली आहे. तरीही बाजारात एकदम तेजीची लाट येईल अशी अपेक्षा करू नये. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून ती धावायला लागेपर्यंत काही काळ निश्चित जाणार आहे आणि ते होईपर्यंतच्या काळात अनेक वेळा आशा आणि निराशेचा खेळही चालणार आहे. त्यामुळे वास्तवाचे भान ठेवूनच पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार करायचा तर मूडीजसारख्या संस्थांनी अर्थव्यवस्थेचे भाकीत नकारात्मक वर्तवले होते. आर्थिक वर्ष 21मध्ये भारतीय आर्थिक वाढीचा वेग 4 टक्के असेल असे आता या संस्था म्हणत आहेत. शून्याच्या खाली विकास दर जाईल असे सांगत असताना आता 4 टक्के वेग राहील असे सांगितले जात आहे. याचाच अर्थ आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल सकारात्मकतेकडे चालू आहे.
गेल्या दोन आठवडय़ापासून शेअर बाजारांची चाल सर्वसाधारणपणे चांगली आहे. पण अजूनही मंदीचा कल संपलेला नाही. तो आता संपेल अशी चिन्हे आहेत. पण तो संपला तरी बाजार उत्साहाने उसळी मारेल असे नाही. स्थिर होऊन तेजीकडे जाताना मध्यंतराच्या काळात पुन्हा एकदा काहीशी अस्थिरता अनुभवायला मिळेल आणि त्यातूनच तेजीकडे जायचा मार्ग मोकळा होईल.
गेल्या दोन ते तीन आठवडय़ात निफ्टीत 1300 हून अधिक अंकांची भर पडली आहे. ही तेजी 15 टक्के आहे. आता थोडेफार कन्सोलिडेशन म्हणजे थोडीशी घसरण होण्याची शक्मयता आहे. कंपन्यांचे आर्थिक परिणाम जाहीर होऊ लागल्यावरही बाजारात काही प्रमाणात सावधानता बाळगली जाईल असे दिसत आहे. याचबरोबर जागतिक शेअर बाजारात काय घडते त्याचाही परिणाम आपल्या शेअर बाजारांवर होणार हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे.
लॉकडाऊनच्या काळातही अमेरिकेत बेरोजगारीचा दर घटला असल्याची चांगली बातमी आली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारांवर होईल यात शंका नाही. भारतासंदर्भात बोलायचे तर भारतीय बाजारपेठेत दैनंदिन मागणी वाढत आहे. त्यामुळे देशाची मासिक मागणी चांगलीच सुधारेल. या स्थितीत शेअर बाजारात काही क्षेत्रे चांगली कामगिरी बजावतील अशी अपेक्षा आहे. मार्चमधील पडझडीनंतर शेअर्सच्या किमती आता बऱयापैकी वाढू लागल्या आहेत. फार्मा, केमिकल्स, बँक आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या किंमती तुलनेने कमी आहेत. पण या क्षेत्रांतील लहान आणि मध्यम कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत.
सरकारने जाहीर केलेली आर्थिक पॅकेजेस अर्थव्यवस्थेला चालना द्यायला उपयुक्त ठरतील. सध्या तरी जागतिक अर्थव्यवस्थेबाबतचा कलही सकारात्मक आहे. शेअर बाजारातही परकीय गुंतवणूकदारांचा पैसा प्रवाही होत आहे. त्यामुळे बाजाराला येत्या काळात हा चांगला आधार मिळेल याविषयी खात्री बाळगायला हरकत नाही. सध्या निफ्टी आणि सेन्सेक्स अडथळय़ाच्या क्षेत्रात आहेत. निफ्टीला 10,200-10,300 च्या टप्प्यावर प्रखर अडथळा येईल. या टप्प्यावर गुंतवणूकदार कदाचित आपला फायदा काढून घेण्याचा विचार करतील.
– संदीप पाटील, शेअरबाजार अभ्यासक