प्रतिनिधी/ बेळगाव
भाजीपाल्याच्या महागाईने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना दिलासा मिळाला असून शनिवारच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर आवाक्यात आले असल्याचे चित्र दिसून आले. गत पंधरवडयात 35 ते 40 रु. किलो असणारा टोमॅटोचा दर 25 ते 30 रु.वर आला आहे. कोरोनो लॉकडाऊन आणि पावसाच्या तडाक्याने भाजीपाल्याचे दर वाढले होते. कांद्याने नागरिकांच्या डोळयात पाणी आले असतानाच भाजीपाला महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. मात्र आता भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने दर कमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भाजीपाल्याचे दर वाढता वाढता वाढे असे चित्र मागील महिनाभरापासून अनुभवायला मिळत होते. भाजीपाल्याचे दर आणि फळांचे दर एकच झाले होते. बाजारात भाजी पेक्षा फळेच अधिक दिसून येत होती. मात्र शनिवारच्या बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याचे दिसून आले. किरकोळ बाजारात मिरची 25 रु. किलो, दोडकी 40 रु. ते 50 रु. किलो, नवलकोल 25 ते 30 रु. किलो, वांगी 50 ते 60 रु. किलो, कारली 40 ते 50 रु. किलो, फ्लॉवर 20 ते 25 रु. नग, कोबी 20 ते. 30 रु. नग, ढबू मिरची 50 रु. किलो, बिन्स 50 ते 60 रु. किलोग्न असा फळभाज्यांचा दर दिसून आला. गत आठवडयात फ्लॉवरचा दर 40 रु. नग तर वांगी 80 ते 90 रु. किलोवर जाऊन पोहचली होती. तीन चार दिवसापासून भाजीपाल्याचे दर कमी झाले असून यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
पालेभाज्यांचे दर देखील कमी झाले असून कोंथिबिरी मात्र महागली आहे. कोथिंबिरीचा दर 10 ते 20 रु. जुडी असून लालभाजीचे दर मात्र कमी झाले आहेत. लालभाजी 20 रु.ला 3 जुडी तर मेथी 10 रु. नग पालक 5 ते 10 रु. नग, शेपू 12 ते 15 रु. जुडी, कांदा पात 20 रु.ला 4 जुडी, मुळा 20 रु. 5 नग, पुदीना 5 ते 10 रु. एक जुडी असा दर आहे. यामुळे गृहिणींना बसलेली महागाईची झळ काही प्रमाणात कमी झाली आहे.
मार्केटयार्ड मधील भाजीमार्केट मध्ये शनिवारी भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. भाजीपाल्याची आवक कमी अधिक होत असून यामुळे दर बदलत आहेत. सध्या टोमॅटोची आवक वाढली असून यामुळे दर कमी झाले आहेत. तसेच कोबी 400 ते 450 रु. दहा किलो, भेंडी 400 ते 450 रु, कारली 450 ते 500 रु. दोडकी 400 रु. दहा किलो, बिन्स 500 रु. दहा किलो असा दर असल्याचे दिसून आले. मागील आठवडयाच्या तुलनेत भाजीपाल्याचे आवक वाढत असून यामुळे दर कमी झाले असल्याचे मत व्यक्त होत आहे.
कांदा बटाटा तेजीत
किरकोळ बाजारात कांदा बटाटा तेजीत असल्याचे दिसून येत आहे. कांदा 40 ते 80 रु. किलोवर जाऊन पोहचला असून यामुळे गृहिणींच्या डोळयात कांद्याने पाणी आले आहे. लॉकडाऊन उठताच हॉटेल सुरु झाली. यामुळे कांद्याची मागणी वाढली मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. तसेच किरकोळ बाजारात बटाटयाचा दर 30 ते 50 रु. किलो असल्याचे दिसून आले.