प्रतिनिधी /बेळगाव
अनलॉकच्या शिथिलतेनंतर मागील महिन्याभरापासून एपीएमसी जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू झाला आहे. शनिवारच्या बाजारात जनावरांची संख्या अधिक होती. खरेदी-विक्री मात्र घटलेली पाहायला मिळाली. त्यामुळे उलाढाल कमी प्रमाणात झाली. मागील आठवडय़ात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, कर्नाटकासह महाराष्ट्रातील जनावरांच्या आठवडी बाजारावर परिणाम झाला होता. त्यामुळे शनिवारच्या जनावरांच्या बाजारात जनावरे दिसून आली तरी म्हणावी तशी खरेदी-विक्री झाली नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात दलाली व शेतकरी मोठय़ा प्रमाणात जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणतात. विविध जातीच्या गायी-म्हशी खरेदी विक्रीसाठी आणल्या जातात. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे बाजारावरही परिणाम होत आहे. त्यातच वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल, मे व जून दरम्यान हा बाजार बंद होता. त्यामुळे दलाल्यांसह दुग्ध उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका बसला होता. खरीप हंगामाच्या तोंडावरच यंदा बाजार बंद झाल्याने बैल खरेदी-विक्री करणाऱया शेतकऱयांसमोर मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या होत्या. मागील महिन्याभरापासून एपीएमसीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू झाला आहे. मात्र, म्हणावी तशी उलाढाल होत नसल्याचे दिसून येत आहे.
अति पावसाचा फटका
अति पावसामुळे बेळगावच्या जनावरांच्या बाजारासह इतर ठिकाणी भरणाऱया बाजारावर परिणाम झाला आहे. शनिवारच्या जनावरांच्या बाजारात आजूबाजूच्या गावांतून आणि आठवडी बाजारातून जनावरे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. मात्र, आजूबाजूला भरणाऱया आठवडी बाजारावर परिणाम झाल्याने बेळगावच्या जनावरांच्या बाजारातही उलाढाल कमी झालेली पाहायला मिळाली.