शहापूर येथील चोरी प्रकरणी तीन महिलांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या आठवडय़ात बसवाण गल्ली, शहापूर येथे झालेल्या चोरी प्रकरणी तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. बाटल्या वेचण्यासाठी म्हणून येणाऱया या महिला बंद घरांना आपले लक्ष्य बनवितात. शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून या महिला कलखांब व वंटमुरी परिसरातील आहेत.
लक्ष्मी दुर्गाप्पा रुद्राक्षी (वय 28), समक्का विजय टेकूर (वय 22, दोघीही रा. सागरनगर, कलखांब), कोला दुर्गाप्पा रुद्राक्षी (वय 20, रा. जनता प्लॉट वंटमुरी) अशी त्यांची नावे आहेत. शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी बसवाण गल्ली, शहापूर येथील प्रमोद अरविंद मरवे यांच्या बंद घराचा दरवाजा फोडून सुमारे 3 लाख 92 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड पळविण्यात आली होती. याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या चोरीमागे महिला कार्यरत असल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याजवळून सोन्या, चांदीचे दागिने, 12 हजार रुपये रोख रक्कम, दोन तांब्याचे हंडे असा अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अटकेची कारवाई पूर्ण करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
कलखांब व वंटमुरी झोपडपट्टीतील या महिला बाटल्या गोळा करण्यासाठी फिरतात. फिरत असताना एखादे बंद घर दिसले की दोन ते तीन दिवस त्या घरावर लक्ष ठेवतात. घरात कोणी नाही हे लक्षात येताच दरवाजा फोडून स्वतः चोरी करतात. या महिलांनी आणखी कोठे चोरी केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे.