प्रतिनिधी /मडगाव
खवळेला समुद्र काहींसा शांत झाल्यानंतर काल बुधवारपासून बाणावली येथील बोटी मच्छीमारीसाठी समुद्रात गेल्या. काल त्यांच्या जाळय़ात बंपर अशी सुंगटे म्हणजे कोळंबी सापडली. एका बाणावली समुद्रकिनाऱयावर जवळपास 25 ते 30 टन कोळंबी पकडण्यात आल्याची माहिती यावेळी मच्छीमारांनी दिली. मच्छीमारी हंगामाला प्रारंभ झाल्यानंतर काल पहिल्याच अशी कोळंबी सापडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून समुद्र खवळेला होता, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाण्याचे टाळले होते. तर काहींनी धाडस करून आपल्या बोटी समुद्रात सोडल्या होत्या. त्यात तीन बोटी बुडण्याचा प्रकार घडला होता. आत्ता समुद शांत झाल्याने मासेमारीने गती पकडली आहे.
कोळंबी 120 रुपये किलो
पूर्वी बाणावली समुद्रकिनाऱयावरच मोठय़ा प्रमाणात मासळी पकडली जायची. तशी परिस्थिती आता राहिलेली नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली. सद्या कोरोना महामारीमुळे कोळंबीवर प्रक्रिया करणारे उद्योग बंद पडलेले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत कोळंबीची मागणी घटली आहे. सद्या 120 रूपये किलो भावाने कोळंबीची विक्री केली जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. गेली दोन वर्षे मासळीमारीच्या हंगामात अशी मासळी सापडली नव्हती. ती यंदा सापडल्याने स्थानिक मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले आहे. सद्या पेट्रोलचे दर वाढले आहेत. कामगारही मिळत नाही अशा अवस्थेत हा व्यवसाय पुढे नेणे कठीण होऊन बसल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.