कोलवासह दक्षिण गोवा पोलिसांची चुप्पी : धिरयोच्यावेळी पोलीस गायब, फोनही बंद
प्रतिनिधी / मडगाव
न्यायालयाने जरी ‘धिरया’sच्या आयोजनावर बंदी घातली असली तरी सासष्टीच्या किनारपट्टी भागात सर्रासपणे धिरयोचे आयोजन होत असून त्याला पोलीस व राजकारण्यांचा आशीर्वाद असल्याचे आत्ता लपून राहिलेले नाही. रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी बाणावली येथे आयोजित करण्यात आलेल्या धिरयोत एक रेडा जागीच ठार होण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, या संदर्भात कोलवा पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही.
रविवार दि. 18 रोजी बाणावली समुद्रकिनाऱयाजवळ धिरयोचे आयोजन करण्यात आले होते. या धिरयोत सहभागी झालेले दोन्ही रेडे हे स्थानिकच होते. एक वार्का येथील तर दुसरा बाणावली येथील होता. दोन्ही रेडय़ाच्या मालकांनी त्यांना धिरयोसाठी सोडले असता ते थोडे अंतर जोरात पळून आले व एकमेकाच्या डोक्यावर जबरदस्त धडक दिली. त्यात एक रेडा जागीच कोसळला. तो पुन्हा उठलाच नाही. त्या अवस्थेतही दुसऱया रेडय़ाने त्याच्यावर हल्ला करणे चालूच ठेवले होते.
प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला : तरीही कोणतीही कारवाई नाही
यावेळी उपस्थितीत असलेल्या रेडय़ांच्या मालकांना एक रेडा ठार झाल्याचे कळून चुकले व त्यांनी दुसऱया आक्रमक झालेल्या रेडय़ावर नियंत्रण मिळविले. ज्या रेडय़ाने जोरदार हल्ला चढविला होता, त्याच्या भीतीने अनेकांनी येथून काढता पाय घेतला. या संदर्भातील व्हिडिओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ दक्षिण गोव्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांपर्यंत पर्यंत पोचला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.
या पूर्वी अशाच प्रकारे आगशी-कुठ्ठाळी येथे धिरयोच्यावेळी रेडा ठार होण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी पोलिसांनी तातडीने स्पष्टीकरण दिले होते. मात्र, बाणावलीत रेडा ठार होण्याच्या संदर्भात कोलवा पोलिसांनी कोणतीच कृती केलेली नाही. कोलवा पोलिसांकडे संपर्क साधला असता, पोलीस म्हणाले की, धिरयो सुरू असल्याची माहिती त्यांना कुणीच दिलेली नाही. जेव्हा रेडा ठार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले तरी पोलीस उत्तर देण्याच्या तयारीत नव्हते.
पोलिसांना धिरयोची माहिती लोकांनी द्यायची ?
कोलवा पोलिसांकडून ज्या पद्धतीने धिरयोना आशीर्वाद मिळत आहे. तसा आशीर्वाद अन्य पोलीस स्थानकाकडून मिळत नाही. धिरयो सुरू असल्याची माहिती पोलिसांना लोकांनी द्यायची की, पोलिसांनी आपल्या हद्दित काय चाललेय याचा शोध घ्यायचा असा सवाल आत्ता उपस्थितीत झालेला आहे. मुक्या प्राण्याचा ज्या पद्धतीने बळी जातो हा भयानक प्रकार आहे. धिरयोत या पूर्वी धिरयो पाहण्यासाठी येणारे लोक देखील जखमी झालेले आहेत. पण, पोलीस मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.
धिरयोच्या काळात पोलीस गायब, मोबाईल फोनही बंद
रविवारची घटना ताजी असतानाच काल बुधवारी सकाळी पुन्हा एकदा कोलवा पोलीस स्थानकाच्या हद्दित धिरयोचे आयोजन झाले. धिरयोचे आयोजन सुरळीत व्हावे, यासाठी पोलिसांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव येत असतो. त्यामुळे पोलीस स्थानकातील अधिकारी देखील गायब होतात. त्याचे भ्रमणध्वनी देखील धिरयो संपे पर्यंत बंद असतात. त्यामुळे या धिरयोने रेडय़ाचे बळी गेले तरी कुणालाच काही पडून गेलेले नाही हे स्पष्ट होत आहे.